अजित पवार फक्त नामधारीच उपमुख्यमंत्री, मदतीची अपेक्षा ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची उपेक्षा 

vijaykumar deshmukh
vijaykumar deshmukh

सोलापूर : अतिवृष्टी आणि महापुराचा जबरदस्त तडाखा बसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मदतीच्या अपेक्षेने बसला होता. महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कसल्याही मदतीची घोषणा केलेली नाही. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून सोलापूकरांची निराशा झाली असून महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार हे फक्त नामधारीच उपमुख्यमंत्री असल्याचा टोला सोलापूरचे माजी पालकमंत्री भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी लगावला आहे. 

आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, आज संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पुणे विभागामध्ये सर्वात जास्त नुकसान हे सोलापूर जिल्ह्यात झाले आहे. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील 58 हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 623 गावे जलमय झाली असून या गावातील 8 हजार 608 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. एकूण 32 हजार 521 नागरिकांना जिल्हा परिषद शाळा, साखर कारखाना तसेच धार्मिक मठांमध्ये ठेवण्यात आले आहे. या बाधितांना शासनाकडून म्हणावी तशी मदत मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. 

या अतिवृष्टीत सोळा जण मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यातून आपल्याला काही तरी मदत मिळेल या अपेक्षेने जिल्ह्यातील शेतकरी बसले होते. अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री आज काही तरी मोठी घोषणा करतील आणि आपल्या पदरी काहीतरी भरघोस मदत मिळेल परंतु या दौऱ्यात मदतीची कसलीच घोषणा उपमुख्यमंत्री पवार यांनी न केल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचेही आमदार देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com