भाजप सरकारचा आणखी एक निर्णय 'महाविकास'च्या रडारवर 

udhhav and devendra
udhhav and devendra

सोलापूर : भाजप सरकारच्या काळातील जलयुक्‍त शिवार योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, वृक्ष लागवड, चारा छावणी यासह अन्य प्रकरणांची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. आता त्यात फडणवीस सरकारच्या काळात सुरु झालेल्या महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून घेतलेल्या 25 विभागांच्या 32 परीक्षांमध्ये आर्थिक देवाणघेवाण व वशिलेबाजीचा सशंय आहे. डिसेंबर 2017 पासून या पोर्टलच्या माध्यमातून 11 हजार 21 पदांची भरती झाली असून त्याची पडताळणी स्वतंत्र संस्थेतर्फे होणार असून त्याची माहिती ठाकरे सरकारने मागविली आहे. 

राज्यातील वाढत्या बेरोजगारीचा सामना करताना अनेक विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीचे स्वप्न पाहिले आणि त्यानुसार अभ्यासही केला. मात्र, चांगल्या गुणाने परीक्षा उत्तीर्ण होण्याचा विश्‍वास असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली नाही. उत्तरपत्रिका तपासणीतील घोळ, निकालातील त्रुटी, ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक चुकांमुळे विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलच्या चौकशीची मागणी केली. खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी पोर्टल बंद करावे आणि पोर्टलच्या चौकशीचीही मागणी केली होती. त्यानुसार महापरीक्षा पोर्टलला कुलूप ठोकण्यात आले असून आता फडणवीस सरकारच्या काळातील भरती प्रक्रियेची पडताळणी करण्याचाही निर्णय ठाकरे सरकारने घेतला. तलाठी भरतीसह अन्य काही विभागांमधील भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा संशय महाविकास आघाडीला असल्याने चौकशी होणार असल्याचेही माहिती व तंत्रज्ञान विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

माहिती सरकारला दिली जात आहे 
विद्यार्थ्यांसह अनेकांनी महापरीक्षा पोर्टलच्या चौकशीची मागणी केली आहे. पोर्टलच्या माध्यामातून डिसेंबर 2017 पासून 25 विभागांमधील रिक्‍त पदांसाठी 32 परीक्षा पार पडल्या. राज्यातील आठ विभागांच्या रिक्‍त पदांसाठी सुमारे 35 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. हा डाटा महापोर्टलकडून माहिती व तंत्रज्ञान विभागाला हस्तांतरीत करण्याची कार्यवाही सुरु असून यापूर्वीच्या परीक्षा व निकालाची माहितीही सरकारला दिली जात आहे. 
- अजित पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाआयटी, मुंबई 

ठळक बाबी... 

  • डिसेंबर 2017 पासून महापरीक्षा पोर्टलच्या माध्यामातून झाल्या 32 परीक्षा 
  • महापरीक्षा पोर्टलद्वारे 25 विभागांमधील 11 हजार 21 पदांची झाली भरती 
  • आठ विभागांतील रिक्‍त जागांसाठी 34 लाख 83 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज 
  • शेवटच्या टप्प्यातील तलाठीसह अन्य पाच विभागांच्या पदभरतीची माहिती पोर्टलकडेच 
  • विद्यार्थ्यांसह लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार आता महापरीक्षा पोर्टलच्या चौकशीसाठी समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com