पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रा भरणार नसून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाता येणार नाही. तथापि परंपरेनुसार देवाचा पलंग मात्र आज सकाळी काढण्यात आला. प्रथेप्रमाणे विठुरायाला टेकण्यास मऊ कापसाचा लोड तर श्री रुक्मिणी मातेस मऊ कापसाचा तक्क्या ठेवण्यात आला. कोरोनामुळे आषाढी यात्रा भरणार नाही भाविकही येणार नाहीत. त्यामुळे विठुरायाचा पलंग काढण्याची प्रथा यंदा अवलंबली जाऊ नये, अशी मागणी होत होती.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी 30 जूनपर्यंत बंद राहणार आहे. तथापि श्री विठ्ठल- रुक्मिणीचे नित्योपचार हे परंपरेनुसार सुरू आहेत. दरवर्षी आषाढी यात्रा कालावधीत श्रींचे २४ तास दर्शन सुरू असते व हा नित्योपचाराचा भाग असल्याने बुधवारी सकाळी ७ वाजता देवाचा पलंग काढण्यात आला. आषाढी यात्रा ही आषाढ शुध्द 1 ते पौर्णिमेपर्यंत भरते. यंदा 1 जुलै रोजी आषाढी एकादशी असून पौर्णिमा 5 जुलै रोजी आहे.
आषाढी यात्रा काळात जास्तीत जास्त भाविकांचे दर्शन व्हावे यासाठी श्री विठ्ठल व रूक्मिणी माता चोवीस तास उभेच असतात. प्रथेनुसार श्री विठुरायाला टेकण्यास मऊ कापसाचा लोड तर श्री रुक्मिणी मातेस मऊ कापसाचा तक्क्या देण्यात आला. या कालावधीत पहाटे चार ते पाच दरम्यान श्रींची नित्यपूजा, सकाळी 10.45 ते 11.15 या कालावधीत महानैवेद्य, रात्रौ साडेआठ ते नऊच्या दरम्यान लिंबूपाणी असे नित्योपचार होणार आहेत.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी देवाचे सर्व नित्योपचार हे नेहमीप्रमाणेच पार पाडले जात आहेत. याच अंतर्गत आता आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना दर्शनासाठी मंदिरात जाता येणार नसले तरी नित्योपचार परंपरेप्रमाणे केले जाणार आहेत. आषाढीतील देवाचे चोवीस तास दर्शन हा नित्योपचारातील भाग आहे. श्रीचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू आहेत अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
पांडुरंगाला ही शिक्षा का....
यंदाची आषाढी यात्रा कोरोनाच्या परिस्थितीमुळे भाविकांच्या अनुपस्थित पार पाडली जाणार आहे. तरीही देवाचा पलंग परंपरेने काढण्यात आला. श्री विठ्ठल मंदिर भाविकांना देवाच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. दर्शनासाठी भाविक जाऊ शकणार नाहीत असे असताना देवाला चोविस तास उभे रहावे लागणार आहे. आणि ही एक प्रकारची देवाला शिक्षाच दिल्यासारखे होणार आहे. त्यामुळे पलंग काढण्याची परंपरा यावर्षी करू नये अशी मागणी भाविकांमध्ये होत होती.
शंभर, दोनशे वर्षात यात्राकाळात भाविकांची गर्दी वाढू लागली. दर्शनासाठीची रांग कित्येक किलोमीटरवर लांब जाऊ लागली. त्यातच देवाच्या नित्योपचारामुळे भक्तांना दर्शन बारीत दोन , दोन दिवस उभे रहावे लागत होते. भाविकांचे झालेले हाल देवाला आवडणार नाहीत म्हणून आषाढी आणि कार्तिकी यात्रा काळात देवाचे नित्योपचार बंद करून मंदिर अहोरात्र ठेवण्यात येऊ लागले असावे.
कारण या परंपरेविषयीचा नेमका तपशील उपलब्ध नाही. देवाच्या नित्य उपचारावेळी दर्शन रांग थांबू नये, मंदिर रात्री बंद केल्यास दर्शन रांग आणखी वाढेल. या गोष्टींचा विचार करून विकांचा त्रास कमी करण्यासाठी पलंग काढण्याची ही परंपरा सुरु झाली असावी. कोरोनामुळे सध्या भाविकांना मंदिरात जाण्यास मज्जाव असल्याने पलंग काढण्याची परंपरा यावेळेस बंद करून देवावर होणारा अन्याय दूर करून भाविकांच्या भावनांची समितीने दखल घ्यावी, अशी मागणी होत होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.