शेतकरी गुडघाभर पाण्यातून पीक वाचवतोय, तर प्रशासन कागदी घोडे नाचवतंय ! शेतकऱ्यांचा संताप 

Barshi Water in field
Barshi Water in field

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील उपळे, नारी, गौडगाव, पानगाव मंडल क्षेत्रात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, कांदा, ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेले तीन दिवस पावसाने विश्रांती दिल्याने शेतकऱ्यांनी काढणीला सुरवात केली आहे. अतिवृष्टीमुळे पावसात भिजून काळे पडलेले, पाण्यात सडलेले सोयाबीन व उडदाचे पीक काढण्यात, वेचण्यात शेतकरी मग्न झाला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले सोन्यासारखं पीक पावसाच्या तडाख्यात मातीमोल झालं आहे; मात्र प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात मग्न असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 

संबंधित अधिकारी व कर्मचारी पंचनामे करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून आदेशाची वाट पाहात आहेत. त्याचा फटका बळिराजाला बसतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. बळिराजाने जड अंत:करणाने खरीप पिकांच्या काढणीला सुरवात केली आहे. जेव्हा अधिकारी शेतात पाहणी करण्यासाठी येतील तेव्हा दाखवायचे काय, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. उरलं-सुरलं पीक पाण्यात ठेवू वाटत नाही तर दुसरीकडे नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी प्रशासन विलंब लावत आहे, या द्विधा मन:स्थितीत शेतकरी सापडला आहे. त्यातच पीक विमा कंपनीस नुकसानग्रस्त पिकांची ऑनलाइन माहिती पाठवत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असल्याचे समोर येत आहे. माहिती भरण्याची प्रक्रिया क्‍लिष्ट आहे त्यामुळे सर्वसामान्य अशिक्षित शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. 

पिंपरी (सा) येथील शेतकरी फरीद शेख, नागनाथ काशीद तसेच परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांनी स्वतःला सावरत काढणीला सुरवात केली आहे. बार्शी तालुक्‍यातील पानगाव, उपळे, नारी, गौडगाव मंडलासह इतर मंडलात सलग नऊ दिवस पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. संपूर्ण बार्शी तालुक्‍यात अतिवृष्टी झाल्याने प्रशासनाने विलंब न लावता सरसकट झालेली नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

पिंपरी (सा) येथील शेतकरी गणेश सुतार म्हणाले, गेल्या तीन दिवसांत पावसाने विश्रांती दिल्याने सोयाबीन काढणीला सुरवात केली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन व उडीद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी प्रशासनाचे कोणीही आमच्या बांधापर्यंत पोचलेले नाहीत. डोळ्यासमोर पिकांचं नुकसान पाहवत नसल्याने कोणाचीही वाट न पाहता काढणीला सुरवात केली आहे. त्यामुळे सरकारने सरसकट झालेले नुकसान ग्राह्य धरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com