तीनचाकी सरकारचा टेम्पो पलटी करणारच : निंबाळकर

BJP Agitation
BJP Agitation

सांगोला (सोलापूर) : सध्या बळीचे राज्य गेले आणि चोरांचे सरकार सत्तेवर आल्याने सांगोला तालुक्‍यावर अन्याय झाला. पाण्यासाठी दुष्काळी जनतेची शेवटपर्यंत साथ सोडणार नसून, महाविकास आघाडी सरकारची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही. हक्काच्या पाण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी शरद पवारांना अंगावर घेतले असून, सध्याच्या तीन चाकांच्या आघाडी सरकारचा टेम्पो पलटी करणारच, असे आव्हान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिले.

सांगोला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
नीरा देवधर धरणातून मिळणाऱ्या पाण्याबाबत सांगोला तालुक्‍यावर झालेला अन्याय, आघाडी सरकारने केलेली शेतकऱ्यांची फसवणूक आणि राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून या घटनांना आळा बसवण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष सांगोला यांच्यावतीने मंगळवारी (ता. 25) सांगोला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, युवक नेते अभिजित नलवडे, नगरसेवक आनंद माने, पाणी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते दत्तात्रर टापरे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऍड. गजानन भाकरे, प्रणव परिचारक, संभाजी आलदर, राजश्री नागणे, विजय बाबर, साहेबराव पाटील, नवनाथ पवार, प्रताप घाडगे, विठ्ठल केदार, दत्तात्रय जाधव, गणेश कदम, शिवाजी गायकवाड, राहुल गायकवाड, पप्पू पाटील, एन. वाय. भोसले यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रसंगी कॅनॉल काय धरण फोडायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही
या वेळी बोलताना खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, गेली 25 वर्षे सत्ता असताना आमच्या हक्काचे पाणी पळवले आहे. शरद पवार यांची दहशत असल्याने मला संपविण्याचा विडा उचलला. आता रणजितसिंह निंबाळकर यांना कसे संपवायचे, याचा विचार सरकार करत आहे. जनतेचा आशीर्वाद पाठीशी असेल तर "हम खडे तो सरकार से बडे, हम दिखाएंगे', असे म्हणत त्यांनी आव्हान दिले. सरकारच्या कानात शिरण्याची वेळ आली असून तीन चाकांचे लबाडांचे सरकार उलथून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जनतेचा कौल नसतानाही लाचार सरकार सत्तेत आले आहे. फडणवीस सरकारने घेतलेले थेट सरपंच निवड, जलयुक्त शिवार, जनतेतून नगराध्यक्ष निवड, मार्केट कमिटीत शेतकऱ्यांचा मतदानाचा हक्क असे महत्त्वपूर्ण निर्णय रद्द केले आहेत. अवकाळीची नुकसानभरपाई दिली नाही. दुष्काळ असताना हीच मंडळी फोटो काढत होती, तीच मंडळी आता सत्तेवर आली आहेत. त्यामुळे पाण्याची चोरी होणार आहे. पण, मी ही कच्च्या गुरूचा चेला नाही. केंद्रात आमचं सरकार आहे आणि राज्यातही येणार आहे काळजी करू नका. तुम्ही आमचं पाणी पळवले आहे. प्रसंगी कॅनॉल काय धरण फोडायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. दुष्काळी जनतेची शेवटपर्यंत साथ सोडायची नाही, असा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तीन चाकांच्या सरकारचा टेम्पो पलटी करणारच, असे थेट आव्हान त्यांनी शरद पवारांना दिले.

चूल बंद करू पण पाण्यासाठी रस्त्यावर उतरू
या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. यापूर्वी फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची 19 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. आताच्या ठाकरे सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले, परंतु त्यांना विसर पडला आहे. भाजपच्या काळात सुरू केलेल्या अनेक योजना आताच्या सरकारने जाणीवपूर्वक बंद केल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा सांगोला तालुक्‍यासाठी हक्काच्या पाण्याची तरतूद केली होती. परंतु आता नीरा देवधरच्या पाणीवाटपात सांगोला तालुक्‍यावर अन्याय केला जात आहे. खासदार निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी वाट्टेल ते आंदोलन करण्याची तयारी केली आहे. चूल बंद करू पण पाण्यासाठी रस्त्यावर उतरू, असा विश्वास श्री. केदार-सावंत यांनी व्यक्त केला.

तहसीलदारांना दिले निवेदन
या वेळी श्रीकांतदादा देशमुख म्हणाले, नीरा उजवा कालव्याचे हक्काचे पाणी शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे. शिवसेनेने जनतेचा विश्वासघात केला आहे. अनेक चांगल्या योजना गुंडाळण्याचा सपाटा लावला आहे. शेतकऱ्यांना उपाशी मारण्याचे धोरण बारामतीकरांनी अवलंबले आहे. तालुक्‍याच्या पाण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या वेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव गायकवाड, विजय बाबर, संभाजी आलदर, ऍड. गजानन भाकरे, राजश्री नागणे, एन. वाय. भोसले यांच्यासह अनेकांनी मनोगते व्यक्त केली. भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत तहसीलदार योगेश खरमाटे यांना निवेदन देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com