सोलापूर : उजनी धरणात सध्या 69 टक्के पाणीसाठा असून प्लसमध्ये 37 टीएमसी पाणी शिल्लक आहे. उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडल्यास धरणातील पाणीसाठा मायनस 28 टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज पाहून उन्हाळ्यात यंदा एक रोटेशन सोडण्याचे नियोजन सुरु असून 2 एप्रिल ते मेअखेर असे पाणी सोडले जाईल. परंतु, त्यासंबंधीचा अंतिम निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
ठळक बाबी...
मागच्या वर्षी लाभक्षेत्रात, जिल्हाभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने धरण हाऊसफुल्ल भरले. मात्र, शहरासाठी नदीतून पाणी सोडणे, रब्बीसाठी एक आवर्तन पाणी सोडले आणि बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठा आता खालावला आहे. आठमाही असलेल्या या प्रकल्पातून ऊस वगळता रब्बी पिकांसाठीच पाणी सोडण्याची तरतूद आहे. मात्र, जिल्ह्यातील वाढलेली कारखानदारी आणि शेतकऱ्यांनी बदललेल्या पीक पध्दतीमुळे उसासाठीदेखील पाणी सोडले जात आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींची मागणी शासन स्तरावर जोर धरून आहे. 'धरण उशाला अन् कोरड घशाला' हे समीकरण बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन करणे, पीक पध्दतीत बदल करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरवर्षी धरण 100 टक्के भरुनही उसामुळे पावसाळ्यापूर्वीच धरण मायनसमध्ये जाते हा अनुभव जुनाच आहे. पाऊस लांबणीवर पडल्यानंतर लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. या पार्श्वभूमीवर आता उन्हाळ्यातदेखील यंदा एकच रोटेशन सोडले जाण्याची शक्यता आहे.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय
धरणात सध्या 69 टक्क्यांपर्यंत पाणी असून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उन्हाळ्यातील रोटेशनचे नियोजन होईल. पाऊस लांबणीवर पडल्यास धरणात शिल्लक पाणीसाठा असावा, या दृष्टीने नियोजन केले जात आहे.
- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.