बिबट्याचे जीवघेणे हल्ले सुरूच ! भिवरवाडीत केला गाय-वासरावर हल्ला; वासरू ठार तर गाय बेशुद्ध 

LEOPARD.
LEOPARD.
Updated on

करमाळा (सोलापूर) : भिवरवाडी (ता. करमाळा) येथे बिबट्याने सोमवारी (ता. 14) पहाटे तीनच्या सुमारास अनिल गोरख आरकिले यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाय व वासरूवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून, वासराच्या शरीराचा मागचा भाग बिबट्याने खाल्ला आहे, तर गायीच्या मानेवर व गळ्यावर बिबट्याने हल्ला केल्याच्या खुणा असून गाय बेशुद्ध पडली आहे. या घटनेमुळे बिबट्याविषयीची या भागातील दहशत कायम आहे. 

या बिबट्याने तालुक्‍यात तीन माणसांचे जीव घेतले आहेत. मात्र 7 डिसेंबरपासून बिबट्याला माणसावर हल्ला करणे शक्‍य न झाल्याने वांगी (भिवरवाडी) भागातील बिबट्याने अखेर गाय व वासरावर हल्ला करून आपली भूक भागवली असून, बिबट्याला मारण्यात वनविभागाला यश मिळत नसल्याने आणखी किती बळी हवे आहेत, असा संतप्त सवाल लोकांमधून उपस्थित केला जात आहे. 

गेल्या दहा-बारा दिवसांपासून करमाळा तालुक्‍यात नरभक्षक बिबट्याची दहशत पसरली आहे. तालुक्‍यातील तीन जणांचा बळी घेऊन, वन विभागाच्या दोनवेळा समोर येऊन त्यांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झालेल्या या बिबट्याचे गेल्या तीन दिवसांपासून सांगवी, बिटरगाव व भिवरवाडी परिसरात वास्तव्य आहे. सांगवी येथील महिलेवर केलेला हल्ला अयशस्वी झाल्यानंतर तो बिटरगाव शिवारात विठ्ठल रोडगे यांच्या शेतात दिसला. वन विभागाच्या यंत्रणेकडून त्याला मारण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो अयशस्वी झाल्यानंतर पुन्हा तो याच परिसरात होता. 

सोमवारी (ता. 14) पहाटे भिवरवाडी येथील गोरख आरकिले यांच्या वस्तीवर बिबट्याने एका गाय व वासरावर हल्ला केला. यामध्ये या दोन्ही प्राण्यांच्या नरड्याच्या भागावर चावा घेऊन प्रथम त्यांना मारण्याचा प्रयत्न केला व नंतर लहान वासराचा फडशा पाडला. माणसाच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याने सात - आठ दिवसांत माणसाची शिकार न मिळाल्याने दुधाची तहान ताकावर भागवली असली, तरी लोकांच्या मनात त्याची भीती कायम आहे. वांगी परिसर त्याच्या भीतीने पुरता हादरून गेला आहे. रविवारी (ता. 13) ढोकरी हद्दीतील भानुदास सलगर यांच्या शेतात बिबट्या खात्रीने आहे, असे लोक सांगत असतानाही वनविभाग व संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले. आणखी एखाद्या नागरिकाचा बळी घेतल्यावर वनविभाग व इतर यंत्रणा जागी होणार का, असाही प्रश्न लोक विचारत आहेत. बिबट्याच्या शोध घ्यायला व त्याला ठार मारणे वन विभागाला शक्‍य नाही का? त्यांना त्याला मारायचे नाही का? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता मात्र लोकांचा संयम सुटत चालला आहे. 

पहाटे मोठ्याने कुत्री भुंकत होती. त्याच सुमारास गायीच्या गोठ्यातून धडपड असा आवाजही आला; मात्र भीतीने आम्ही बाहेर आलो नाही. आम्हाला बिबट्या असल्याची शंका आली होती. त्यादरम्यान वन विभागाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो झाला नाही. सकाळी लवकर वन विभागाला सांगितले, मात्र वन विभागाचे लोक निरोप दिल्याच्या पुढे दोन - अडीच तासांनी पोचले. वन विभागाला बिबट्याचे काही गांभीर्य दिसत नाही. 
- अनिल आरकिले,
भिवरवाडी, ता. करमाळा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com