कोरोना का वाढला? जाणून घ्या नेमकी कारणे ! काळजी घ्या, अजूनही वेळ गेलेली नाही

sakal_corona
sakal_corona

सोलापूर : कोरोना वाढू लागल्याने राज्यभर पुन्हा लॉकडाउन करायचा की नाही, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 1 मार्च रोजी निर्णय घेणार आहेत. तत्पूर्वी, नागरिकांना त्यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, सोलापूरकरांनी त्यादृष्टीने अंमलबजावणी सुरू केली आहे. 

लॉकडाउन केल्यानंतर सोलापुरातील विडी व यंत्रमाग, गारमेंट उद्योगातील हातावरील पोट असलेल्या कामगारांचे काय होईल, बांधकाम कामगारांचे काय होईल, याची चिंता सतावू लागली आहे. पहिल्या लाटेत लोकांना मदत करताना अनेक नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाली. अनलॉकनंतर आता सर्व काही सुरळीत चालू होते, मात्र प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध काटेकोरपणे पाळले गेले नाहीत. त्यामुळे रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. परंतु, अजूनही वेळ गेली नसून नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन केल्यास निश्‍चितपणे कोरोनाला ब्रेक बसेल, असा विश्‍वास आरोग्याधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी व्यक्‍त केला आहे. लॉकडाउन झाल्यानंतर बॅंका, खासगी सावकारांच्या कर्जाचा बोजा, पोटभर अन्नाची चिंता, कुटुंबातील सदस्याच्या हाताला काम नाही, मुलाची नोकरी गेली, अशा विविध कारणांमुळे अनेकांनी आपली जीवनयात्रा अर्ध्यावरच संपविली. या पार्श्‍वभूमीवर आता सर्वांना नियमांचे पालन करावेच लागेल, असे आवाहन सोलापूरकरांनी केले आहे. 

रुग्णवाढीची प्रमुख कारणे... 

  • कोरोनाबद्दलची भीती नागरिकांमध्ये पूर्वीसारखी दिसतच नाही 
  • मास्कचा वापर होत नाही तथा कमी होऊ लागला, अनलॉकनंतर वाढली गर्दी 
  • प्रशासनाने घालून दिलेल्या संख्येचे कोणतेही निर्बंध पाळलेच नाहीत 
  • विवाह, आंदोलने, सभा, सार्वजनिक कार्यक्रमांना शेकडोंची राहिली उपस्थिती 
  • सार्वजनिक व खासगी प्रवासाच्या ठिकाणी ना वैद्यकीय तपासणी ना कोणत्याही शासकीय यंत्रणांचे लक्ष 
  • आता जुन्याच नियमांचे काढले नवे आदेश; पुन्हा कडक अंमलबजावणीचे निर्देश 

लॉकडाउनमुळे अनेकांचे गेले जॉब 
लॉकडाउन पुन्हा कोणालाही नको आहे. कोरोनामुळे अनेकांचे जॉब गेले असून पगारालाही कात्री लावली जाते. लॉकडाउन केल्यानंतर गोरगरिबांनी खायचे काय, असा मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे सर्वांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन तंतोतंत केल्यास सर्वजण सुखी-समाधानी राहतील. 
- सोनाली झळके, 
गृहिणी 

रोजंदारी करणाऱ्यांसमोर सर्वाधिक अडचणी 
लॉकडाउन हा कोरोनाला रोखण्याचा अंतिम उपाय नाहीच. लॉकडाउनमुळे रोजंदारी करणाऱ्यांचे वांदेच होणार आहेत. काम केल्यावरच त्यांना खायला मिळते, अशा लोकांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी सामजिक बांधिलकीतून सर्वच स्तरातील नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचा निर्धार करायला हवा. 
- वर्षा मोरे, 
शिक्षिका 

आम्ही नियम पाळतोय, तुम्हीपण पालन करा 
पहिल्या लॉकडाउनमध्ये अनेकांना उपाशीपोटी दिवस काढावे लागले. खूपजणांनी मदत केली. परंतु दुसऱ्यांदा लॉकडाउन केल्यास हातावरील पोट असलेल्यांना खायला पोटभर अन्नसुद्धा मिळणार नाही. त्यामुळे लॉकडाउन टाळण्यासाठी आम्ही नियम पाळतोय, सर्वांनीही नियमांचे तंतोतंत पालन करावे. 
- सविता गुमटे, 
ज्येष्ठ नागरिक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com