
सोलापूर : अभिमानश्री नगरातील सुनील सदाशिव मोरे यांच्या खात्यातून 26 हजार 355 रुपये परस्पर ऑनलाइन काढून घेतल्याची घटना बुधवारी (ता. 17) घडली. एका अनोळखी मोबाईलवरून मोरे यांना कॉल आला. त्या वेळी स्टेट बॅंकेतून बोलत असून तुमचे आयटी रिटर्नचे पैसे जमा करा, असे त्याने सांगितले. तुमचा एलआयसीचा हप्ता कट झाला असून तुमची एलआयसी पाहिजे का, असेही त्याने विचारले. त्या वेळी मी पॉलिसी काढली नसल्याचे मोरे यांनी सांगितले. त्या वेळी तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा करून देतो, मोबाईलवरील ओटीपी सांगा, असे त्याने मोरे यांना सांगितले. मोरे यांनी समोरच्या व्यक्तीला ओटीपी दिला आणि त्याने ही रक्कम काढून घेतली, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. तळे हे करीत आहेत.
फोटो काढण्यासाठी दिलेले पाच तोळ्यांचे सोन्याचे कडे गायब
भय्या चौकातील जाम मिलच्या कोपऱ्यावर सोन्याचे कडे घालून दोघे फोटो काढत होते. त्या वेळी अनिकेत अंकुश केदार (रा. देशमुख- पाटील वस्ती) यांच्या हातातील सोन्याचे कडे फोटो काढण्यासाठी अजिंक्य राजाराम सुरवसे (रा. गवळी वस्ती) याने घेतले. काही वेळाने अनिकेतला त्याच्या चुलत भावाचा कॉल आला आणि त्याच्या खात्यावर पाठविलेले पैसे आणून दे म्हणून सांगितले. अनिकेतने पैसे काढले आणि डफरीन चौकात भावाला दिले. त्यानंतर रामलाल चौकात आल्यानंतर अनिकेतने अजिंक्यला सोन्याचे कडे मागितले. मात्र, कडे कुठे गेले, कुठे पडल्याची माहिती नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे अजिंक्यने माझी फसवणूक केली, अशी तक्रार अनिकेत केदार याने फौजदार चावडी पोलिसांत दिली. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. पैकेकरी हे करीत आहेत.
आत्महत्याग्रस्त महिलेच्या कुटुंबीयांची तक्रार देण्यास नकार
जोडभावी पेठ पोलिस ठाण्यातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वी हगलूर परिसरात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या व्हॉट्सऍप मेसेजमुळेच आत्महत्या केल्याचा संशय होता. याचा तपास तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्याकडे सोपविण्यात आला. परंतु, आत्महत्या केलेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी तक्रार देण्यास नकार दिल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी वाढवली कारवाईची मोहीम
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात यावा या हेतूने शहर पोलिसांनी आता सात पोलिस ठाण्याअंतर्गत बेशिस्तांवरील कारवाई कडक केली आहे. मंगळवारी शहर पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या 148 जणांकडून 74 हजारांचा दंड वसूल केला. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांकडूनही 36 हजारांचा दंड वसूल केला. प्रवाशांची मर्यादा न पाळता वाहने चालविणाऱ्या पाचजणांकडून अडीच हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलिस आयुक्तालयाकडून देण्यात आली.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.