शेतं गेली धुऊन, पिकं गेली वाहून, हतबल बळिराजा रडला ढसढसा हे पाहून ! 

Crop Damage
Crop Damage

वाळूज (सोलापूर) : एरव्ही आभाळाकडं डोळे लावून पावसाची वाट पाहणाऱ्या बळिराजाच्या स्वप्नातही वाटलं नव्हतं, की थेंबा-थेंबासाठी तरसवणारा वरुणराजा इतका तुफान बरसेल की काही क्षणात होत्याचं नव्हतं होईल ! चक्री वादळामुळे मंगळवारी आणि बुधवारी (13व 14 ऑक्‍टोबर) सलग 16 तास अतिवृष्टी झाली. यामुळे नद्यांना यापूर्वी कधीच पाहिला नाही असा महापूर आला आणि या महापुरात नदी-ओढ्यांच्या परिसरातील शेतातील पिके मातीसह वाहून गेली. हतबल बळिराजाच्या डोळ्यांदेखत होत्याचं नव्हतं झालं. हातातोंडाशी आलेली पिके अक्षरशः पाण्यात वाहून गेली. 

2020 हे वर्ष अनेक संकटांसह सर्वांसमोर उभे ठाकले आहे. कधी सुल्तानी तर कधी अस्मानी संकटांची मालिका शेतकऱ्यांसमोर उभी आहे. कोरोनामुळे अचानक झालेल्या लॉकडाउनमध्ये बाजारपेठा बंद असल्याने शेतात पक्व झालेली आणि काढणीयोग्य झालेली फळे व पिके बळिराजाने अक्षरशः बांधावर काढून टाकून दिली. आता बाजार चालू झाले आणि गेल्या आठ - दहा दिवसांपूर्वी येऊन गेलेल्या वादळामुळे निर्माण झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या तडाख्यात शेतातील मातीसह पिके मुळासकट उपटून वाहून गेली. काही तासांत होत्याचं नव्हतं झालं. वाळूज, देगावसह भोगावती नदीकाठच्या शिवारांचा अक्षरशः वाट लागली आहे. 

वाळूज येथील ज्ञानेश्वर कादे यांच्या शेतातील भरडून वस्तीवरील पत्राशेडमध्ये ठेवलेले 50 कट्टे सोयाबीन पाण्याच्या प्रवाहात दूरपर्यंत वाहून गेले. जे राहिले होते ते तीन दिवस पाण्यातच बुडाल्याने पाण्याने भिजल्याने फुगून व मोड आल्याने पोती फाडून उगवून आले. उसाच्या बुडातील माती पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून जाऊन मुळ्या उघड्या पडल्या. सर्व ऊस आडवा पडल्याने गाळात बुडाला आहे. त्यावर गाळाचा थर साठला आहे. काही द्राक्षबागा पूर्ण पाण्यात बुडाल्या, त्यामुळे फांद्या सडल्यासारख्या झाल्या आहेत. पानांचे फुटवे सडल्याने गळून गेले आहेत. कांदा, टोमॅटो, भेंडी, मिरची, गवार यासह पालेभाज्या व फळभाज्या नासून गेल्या आहेत. जास्तीच्या पाण्यामुळे झाडे सडून गेली आहेत. अक्षरशः कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

विविध पक्षांच्या नेत्यांनी फोटो काढण्यासाठी हायवेच्या कडेच्या शेतांना भेटी न देता व पाहणी दौरा न करता वाळूज, देगावसारख्या गावांना भेट द्यावी व किती प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे, ते पाहून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com