Telya
Telya

तेल्या, कुजवा रोगाने डाळिंब बागा जमीनदोस्त ! विमा मिळण्याबाबत साशंकता: शेतकरी दुहेरी संकटात 

मंगळवेढा (सोलापूर) : तेल्या व ज्यादा पावसामुळे आलेल्या कुजवा रोगामुळे मंगळवेढा तालुक्‍यातील डाळिंब बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. अशा परिस्थितीत पाणी लागलेल्या फळपिकांच्या पंचनाम्यास अद्याप सुरवात झाली नाही. विमा कंपनीच्या चुकीच्या निकषांमुळे डाळिंब पिकाला विमा मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाल्याने दुहेरी संकटात फळ उत्पादक शेतकरी सापडला आहे. 

गेल्या दोन वर्षात डाळिंबाला मिळालेला दर, विम्यामुळे, मनरेगामुळे तालुक्‍यात डाळिंबाचे क्षेत्र वाढले. अशा परिस्थितीत यंदाच्या हंगामातील मृग बहरात सुरुवातीला बाग भरलेल्या शेतकऱ्यांना तेल्या रोगाचा सामना करावा लागला. तर उशिरा धरलेल्या बागांसाठी सलग झालेल्या दमदार पावसामुळे कुजवा रोगाचा सामना करावा लागला. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातील फळबागा वाया गेल्या आहेत. अशा परिस्थितीत हवामान आधारित फळपीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांतून विमा कंपनीच्या निकषामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 

यंदाच्या हंगामातील प्रधानमंत्री फसल विमा योजना सलग तीन वर्षे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 5 जून 2020 च्या शासन निर्णयात 14 जिल्ह्यांसाठी मृग बहारात डाळिंब पीक विमा अधिसूचित करण्यात आले आहे. त्यामध्ये 15 जुलै ते 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर, 1 ऑक्‍टोबर ते 15 डिसेंबर असे तीन टप्पे करण्यात आले. या तीन टप्प्यांमध्ये पाच ते आठ दिवस सलग 25 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस 85 टक्केपेक्षा कमी आर्द्रता असेल तर त्याच्या टप्प्यानुसार विम्याची रक्कम मंजूर करण्याबाबत सूचना आहे. त्यासाठी हेक्‍टरी 1 लाख 30 हजार रुपये दर निश्‍चित केला. परंतु यंदाच्या हंगामामध्ये एकाच दिवशी तालुक्‍यातील सात मंडलांमध्ये 125 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडून डाळिंब पिकाचे कुजवा रोगामुळे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बागा जूनपूर्वी धरल्या त्यांना तेल्या रोगाने तर ज्यांनी उशिरा धरल्या त्यांना कुजवा रोग झाल्याने दुहेरी संकटात डाळिंब उत्पादक शेतकरी सापडला. 

सध्या तालुक्‍यातील बहुतांश गावांत पिकाला पाणी लागले आहे. त्या पाणी लागलेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे तहसीलदारांनी आदेश दिले. परंतु कृषी सहाय्यक व तलाठी आपणास अद्याप आदेश नाहीत असे सांगून पंचनामे केले नाहीत. तर ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे, त्यांना विमा कंपनीच्या चुकीच्या निकषामुळे पैसे मिळण्याची शक्‍यता नसल्यामुळे तालुक्‍यातील डाळिंब उत्पादक शेतकरी उद्‌ध्वस्त होण्याची भीती आहे. 

याबाबत आमदार भारत भालके म्हणाले, हवामानावर आधारित फळपीक विम्यासाठी लावलेले निकष चुकीचे असल्याने जिल्ह्याला त्याचा लाभ होणार नाही. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात आहे. शासन निर्णयातील निकष रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना भेटून निवेदन दिले आहे. तसेच याबाबत पाठपुरावा सुरूच आहे. 

चिक्कलगी येथील शेतकरी ईश्‍वर निकम म्हणाले, एक एकर डाळिंब बाग गतवर्षी पाण्याअभावी जळाली. निकषाच्या अटीमुळे महसूल मंडळ वगळल्याने विमा मिळाला नाही. यंदा ज्यादा पाऊस झाल्याने कुजवा रोगाने बाग वाया गेली आहे. अशात दोन वर्षातील संकटामुळे पिकासाठी केलेला खर्च देखील निघाला नाही आणि पीकविमा मिळण्याची शक्‍यताही नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com