बार्शीत प्रथमच काजूचे उत्पादन ! प्रयोगशील शेती करून शेतकऱ्याने घेतले लाखो रुपयांचे उत्पन्न 

Kaju_Barshi
Kaju_Barshi

बार्शी (सोलापूर) : पूर्ण एक वर्ष होत आले तरी कोरोना संसर्गाच्या भीतीने शासनाने काही प्रमाणात लॉकडाउन जरी शिथिल केलेला असला तरी बाजारपेठेमध्ये सुधारणा होताना दिसत नाही. कवडीमोल किमतीने भाजीपाला विक्री होत आहे. पण बार्शी तालुक्‍यातील कापसी (सावरगाव) येथील प्रयोगशील शेतकऱ्याने साडेतीन एकरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिके घेऊन लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे अन्‌ लॉकडाउनवर मात केली आहे. तसेच बार्शी तालुक्‍यात प्रथमच या शेतकऱ्याने काजूचे उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. 

बार्शी तालुक्‍याच्या अखेरच्या सीमेवर कापसी हे गाव असून, बार्शी शहरात किराणा व्यवसायाचे छोटेसे दुकान थाटून प्रशांत ज्ञानदेव सुरवसे, भाऊ अभिजित सुरवसे, त्यांच्या पत्नी तेजस्विनी, श्रीपदा, त्यांची मुले, मुली, वडील सेवानिवृत्त सैनिक ज्ञानेश्वर सुरवसे, आई सुमन सुरवसे एकत्र कुटुंबात राहून शेती करतात. 

प्रशांत सुरवसे सांगत होते, पेरू अर्धा एकरमध्ये 300 झाडे, 35 गुंठ्यात काजूची 150 झाडे, सीताफळ एक एकरमध्ये 600 झाडे अन्‌, अर्धा एकरमध्ये कोबीची लागवड केली आहे. भुईमूग, कांदे, मिरची, काकडी अशी आंतरपिकेही घेतली आहेत. 

पेरूचे पीक तीन वर्षांपासून घेत असून वर्षात दोन हंगाम मिळतात. सरासरी 50 हजारांपेक्षा जास्त उत्पन्न मिळते तर काजूचे रोप गेल्या वर्षी दापोली कोकण येथून 145 रुपयांना एक याप्रमाणे आणून लागवड केली होती. प्रति झाड एक किलो काजूचे उत्पन्न होऊन 60 हजार रुपयांचे उत्पन्न गेल्यावर्षी मिळाले. यावर्षी झाडे मोठी होऊन बहरली असून प्रतिझाड दीड ते दोन किलो उत्पन्न मिळते. बाजारात 700 रुपये किलोने काजूची विक्री होत आहे. 

पेरूचे मागील तीन वर्षांपासून उत्पन्न घेत असून वर्षभरात दोन हंगाम मिळतात. एका पेरूचे वजन 300 ते 400 ग्रॅम असते. एका किलोत तीन पेरू बसतात. एका हंगामात सरासरी 50 हजारांपेक्षा जास्त उत्पन्न मिळते. हैदराबाद, ठाणे, मुंबई येथील बाजारपेठ मिळते. 

विशेष म्हणजे शेतात शेतमजूर नाही. दोघे भाऊ, आई शेतात जाऊन पाणी देणे, तण काढणे अशी कामे करतो. शेणखत आणि फवारणीसाठी वर्षाकाठी 40 ते 50 हजार रुपये खर्च येत असून, पूर्ण शेतात ड्रीपने पिकांना पाणी देत असल्याने पाण्याचीही बचत होत आहे. विहीर, शेततळे असल्याने पाणी व्यवस्थित पुरते. 

वडील ज्ञानदेव सुरवसे यांच्यासह दोन्ही चुलते चांगदेव सुरवसे व शिवाजी सुरवसे हे देखील सैन्यामधून सेवानिवृत्त झाले आहेत. समान वाटण्या करून सर्वजण प्रयोगशील शेती करीत आहेत. चांगदेव सुरवसे बार्शीतील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. 

एकाच पिकावर शेतकऱ्याने अवलंबून न राहता वेगवेगळी पिके घेतली तर नुकसान कमी येते, असा अनुभव आला आहे. एका पिकात नुकसान झाले तर दुसऱ्या पिकात फायदा होतो. प्रत्येक पिकाचा हंगाम वेगळा येत असल्याने वेळ देता येतो. बाजारपेठेवर भरवसा नसून दलाल, वाहन चालक यांच्यावर विश्वास ठेवून मालाची विक्री करावी लागते. प्रत्यक्षात काय भावाने विक्री झाली समजत नाही, ही प्रत्येक शेतकऱ्याची खंत आहे. 
- प्रशांत सुरवसे, 
शेतकरी, कापसी सावरगाव 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com