सोलापूर : होटगी रोडवरील विमानसेवा सुरळीत व्हावी, यासाठी श्री सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याबाबत उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यानुसार महापालिकेने निवीदाही अंतिम करण्यात आली, परंतु लॉकडाउनमुळे पुढील कार्यवाही थांबलेली आहे. तत्पूर्वी, महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी पत्र दिले असून अद्याप बैठक झालेली नाही. मात्र, चिमणी पाडल्यानंतरही रन-वे लहान असल्याने मोठी विमाने उतरताना अथवा उड्डाण करताना अडचणी येणारच आहेत, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने दिले आहे.
केंद्र सरकारने 2014 मध्ये सुरू केलेल्या "उडान' योजनेत सोलापुरातील विमानतळाचा समावेश झाला. मात्र, श्री सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा असल्याचे कारण पुढे करीत आतापर्यंत ही योजना सोलापुरसाठी लागू होऊ शकलेली नाही. आता चिमणी पाडल्यानंतरही विमानतळाचे प्रश्न सुटणार नसल्याचे समोर आले आहे. चिमणी पाडल्यानंतर तथा चिमणीची उंची कमी केल्यानंतरही मोठ्या विमानांसाठी रन-वे कमीच पडणार आहे. तर चिमणी पाडल्यानंतर उर्वरित अडथळ्यांची शर्यत पार करण्यासाठी आणखी विलंब होणार आहे. त्यामुळे आता बोरामणी विमानतळाचा विकास केला जाणार असून उर्वरित क्षेत्राचे संपादन करण्यासाठी राज्य सरकारकडून 50 कोटी रुपये मंजुर झाले आहेत. परंतु, कोरोनामुळे आता राज्याची आर्थिक स्थिती अडचणीची असल्याने ते पैसे अजून मिळालेले नाहीत. पुढच्या वर्षात रन-वे केला जाणार असून डिसेंबर 2021 पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन झाले आहे.
ठळक बाबी...
बोरामणी विमानतळ विकासाचे नियोजन
होटगी विमानतळासाठी सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा आहे. मात्र, चिमणी पाडल्यानंतरही 125 अथवा 150 सीटर विमाने त्याठिकाणी येण्यासाठी रन-वे वाढवावा लागेल. मात्र, चिमणी पाडल्यानंतरही तो वाढविण्यास अडचणी आहेत. त्यामुळे बोरामणी विमानतळ विकसित करण्याचे नियोजन हाती घेतले आहे.
- अनिल पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण, मुंबई
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.