सांगोला (सोलापूर) : दुष्काळी सांगोला तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतीची दाणादाण उडाली असून पिके वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे तालुक्यात हाहाकार उडाला असून माण नदीचे पाणी नदीकाठच्या शेतात शिरल्याने अंदाजे साडेतीन हजार हेक्टरवरील पिके, फळबागांचे अतोनात नुकसान झाले. 243 घरांची पडझड झाली असून 193 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुराचा वीस गावांना फटका बसला असून चार जनावरे, 15 कोंबड्या, 15 शेळ्या दगावल्या आहेत.
गेल्या 20 वर्षात प्रथमच सांगोला तालुक्यात अतिवृष्टीमुळे दाणादाण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते, पूल, शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील प्राथमिक अंदाजानुसार 3 हजार 484 हेक्टरवरील डाळिंब, ऊस, मका व बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी दिली.
महूदमध्ये पाच कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले असून 26 घरांची पडझड झाली. तर 15 कोंबड्यांचा मरण पावल्या आहेत. चिकमहूदमध्ये 35 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले असून 40 घरांची पडझड झाली. महिममध्ये 40 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले असून 50 घरांची पडझड झाली. तर तीन जनावरे व दहा शेळ्यांचा मृत्यू झाला. खवासपूरमध्ये 4 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले. शिवणे येथील दोन कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले असून एका घरांची पडझड झाली. वाकी शिवणे येथील तीन कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले असून 7 घरांची पडझड झाली आहे. तर तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. नरळेवाडीत 5 घरांची पडझड झाली आहे. नाझरा येथे 60 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले.
सरगरवाडीत दोन शेळ्यांचा मृत्यू झाला असून एका घराची पडझड झाली. बलवडीत 38 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले. तर 85 घरांची पडझड झाली आहे. य.मंगेवाडीत एका जनावराचा मृत्यू झाला आहे. अकोला येथे तीन कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले. कडलासमध्ये तीन कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले तर एका घराची पडझड झाली. तसेच करांडेवाडी 1, कटफळ 1, इटकी 1, लोटेवाडी 1, अचकदाणी 5, लक्ष्मीनगर 15, अनकढाळ 1, वझरे 1, राजुरी 1 अशा घरांची पडझड झाली आहे.
अतिवृष्टीचा व पुराचा सांगोला तालुक्यातील वीस गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. 200 घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून 193 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. मुसळधार पावसाने सुमारे 243 घरांची पडझड झाली असून चार जनावरे, 15 कोंबड्या, 15 शेळ्या दगावल्या आहेत. पुराचा पाण्याच्या प्रवाहामुळे 37 बंधारे, तलाव बाधित झाल्याने 183 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. सात पुलांचे नुकसान झाले असून एका विहिरींची रिंग पडली आहे.
संपादन : वैभव गाढवे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.