तोफ डागली की `या`शहरातील व्यवहार व्हायचे बंद 

तोफ डागली की `या`शहरातील व्यवहार व्हायचे बंद 

सोलापूर : सोलापूर शहर आजच्या स्थितीला कामगार व कष्टरकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जात असले तरी या शहराला जुनी व मोठी ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. सुमारे आठ चौरस मील इतके क्षेत्रफळ असणाऱ्या सोलापूर शहराचे आजचे क्षेत्रफळ 179 चौरस किलोमीटर इतके झाले आहे. सोलापूर नगरपालिकेने 1953 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ऐतिहासिक सोलापूर नगरपालिका शतसंवत्सरिक ग्रंथात अ. का. जोशी यांनी 1853 पासूनच्या सोलापूरचे वर्णन केले आहे. या पुस्तकाच्या आधारे सोलापूरच्या इतिहासाच्या पानात डोकावताना फारच मनोरंजक माहिती मिळते. 


साधारणपणे 150 वर्षांपूर्वी 1852-53 च्या आसपास सोलापूर शहराभोवती भरभक्कम तट होता. त्याला गावकुस किंवा आरवा म्हणत. सध्याच्या गोल्डफिंच पेठ, दक्षिण व उत्तर कसबा पूर्व व पश्‍चिम मंगळवार पेठ व शुक्रवार पेठांभोवती हा तट होता. गावकुसांमध्ये आठ मजबूत वेशी होत्या. त्यामध्ये किल्ल्याच्या दरवाज्या समोरील रेवणीवेस राणी लक्ष्मीबाई मंडईसमोर पाणीवेस विजापूर वेस दारीवेस (सध्याचा समाचार चौक), कुंभार वेस, तुळजापूरवेस, बाळीवेस, देगाव वेस यांचा समावेश होतो. या सर्व वेशी पाडून टाकण्यात आल्या. तथापि विजापूर वेस, तुळजापूर वेस, कुंभार वेस व बाळीवेस अद्यापही प्रचारात आहेत. या वेशींपुढे असलेली मारुतीची मंदिर आजही अस्तित्वात आहेत. तटाच्या आत 225 एकर जागा होती. संपूर्ण शहरात 3600 घरे व 30 हजारच्या आसपास लोकसंख्या होती. 


सोलापुरातून मोठ्या गावांकडे आठ रस्ते जात. त्यापैकी दोन मोगलाईकडे, एक तुळजापुरास, दुसरा नळदुर्ग व कल्याणकडे, तिसरा अक्कलकोटास, चौथा विजापूरकडे, पाचवा पंढरपूरकडे, सहावा टेंभुर्णीमार्गे पुण्याकडे सातवा परांड्याच्या जुन्या किल्ल्याकडे तर आठवा रस्ता पाणीवेसपासून मंद्रूपकडे जाणारा होता. रस्त्याच्याकडेला पिंपरी, निंब, शिरस व अश्‍वस्थ नारायणाची झाडी होती. रात्री विजेची सोय नव्हती. घासलेटचा प्रवेश सोलापुरात झाला नव्हता. त्यामुळे सूर्यास्त झाला की शहर काळोखात बुडायचे. रात्री नऊ वाजता तोफ डागली जायची. त्या वेळी लोक आपापली दुकाने बंद करून घरी परतत. रात्रीच्या अंधारात गायी व इतर जनावरे रस्त्यावर फिरत, त्यामुळे वासरूंना अपघातही होत. रात्री 10 ते पहाटे चार वाजेपर्यंत गावात पोलिस पहारा करीत. पहाटे पाच वाजेपर्यंत वेशीचे दरवाजे बंद असत. त्यामुळे कोणालाही प्रवेश मिळत नसे किंवा बाहेर जाता येत नसे. वाटसरू आला तर रात्रभर त्याला बाहेरच मुक्काम करावा लागे. 


शहरातील बहुतेक घरे एकमजली होती. श्रीमंत व्यक्तीचे दुमजली घर होते. भाजीपाला व फळफळावळ विक्रीसाठी मार्केट नसल्यामुळे बागवान गल्ली व भाजी गल्लीत रस्त्यावरच विक्री होई. शहरात आयात होणाऱ्या मालात कापूस मोठ्या प्रमाणात असे. याशिवाय मीठ, किराणा, भुसार, शाली, विभूती आदी मालाचीही मोठ्या प्रमाणात आयात होई. रेल्वेचा उगम अद्याप झालेला नव्हता. कापड गिरण्या, शाळा महाविद्यालये नव्हती. एकरूख तलाव बांधलेला नव्हता. नगरपालिकेची एकही शाळा नव्हती. पोस्ट व तारखाते सुरू झाले नव्हते. सिद्धेश्‍वर देवालयासमोरचा भव्य व शोभिवंत मंडप अस्तित्वात नव्हता. विशेष म्हणजे आग विझवण्यासाठी कसलीच व्यवस्था नव्हती. 

सोलापूर नावाची उत्पत्ती 
सोलापूर नावाची कशी उत्पत्ती झाली याचा इतिहास अतिशय रंजक आहे. अहमदपूर, अदिलपूर, चमलादेव, फत्तेपूर, जामदारवाडी, काळजापूर, खादरपूर, खंडेराववाडी, महंमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनापूर व वैद्यवाडी अशा 16 गावांच्या एकीकरणातून सोलापूर नावाची उत्पत्ती झाल्याचे कागदपत्रांतून आढळते. वरील 16 खेड्यांपैकी 
नावाची छाननी केली तर काही ठिकाणी सोनापूर, तर काही ठिकाणी समशेरवाडी असा उल्लेख आहे. याशिवाय सोलापूर हद्दीत मसरापूर व भोगापूर या खेड्यांचाही समावेश असल्याच्या 
नोंदी आढळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com