चहा-नाश्‍त्याची ठिकाणे म्हणजे "रेड झोन'चा समज ! हॉटेल व्यावसायिक मात्र आर्थिक संकटात

Hotel.j
Hotel.j

केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे बरेच दिवस लॉकडाउन असल्याचा फटका अनेक उद्योग व व्यवसायांना बसला. यातून हॉटेल व्यवसाय कसा अपवाद राहील! कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ग्राहकांनी जेवण व नाश्‍ता यावर स्वतःच स्वतःवर बंधने घातली असल्याने हॉटेलमध्ये ग्राहकांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय मोडकळीस आल्याचे दिसत आहे. 

शहरी भागासह ग्रामीण भागातील चहा टपरी, वडापाव, पाणीपुरी, चायनीज सेंटर, मिठाईची दुकाने आदी व्यावसायिकांची दुकानेही सध्या बंद आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्वयंस्फूर्तीने ग्राहकच घराबाहेरचे खाणे टाळत आहेत. त्यामुळे हॉटेलमध्ये व नाश्‍त्याच्या ठिकाणी जाणे म्हणजे "रेड झोन'मध्ये गेल्याचा समज या व्यावसायिकांच्या मानगुटीवर बसला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. 

अनलॉक चारमध्ये हॉटेल्स शंभर टक्के सुरू करावीत, असा आदेश असतानाही तालुक्‍यासह जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक मात्र ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च अखेरपासून केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केले व पुढेही लॉकडाउन हे वरचेवर वाढता वाढता वाढतच गेले. त्यामुळे गेल्या सात-साडेसात महिन्यांपासून हॉटेल व्यवसाय बंद राहिला. 

1 सप्टेंबरपासून शंभर टक्के हॉटेल सुरू करण्याचे आदेश दिले; परंतु हॉटेलमध्ये ग्राहक फिरकत नसल्याने हॉटेल सुरू करूनही काही उपयोग झाला नाही. शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागल्याने या सर्वांचा फटका मात्र हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. हॉटेलमधील मजूरही आता दुसरीकडे मजुरी करू लागला आहे. तसेच हॉटेल व्यवसाय सुरू करतानाही नवीन नियम, अटी व बंधने आली आहेत. हॉटेलमध्ये चहा घेतानाही कपबशी अथवा काचेच्या ग्लासमध्ये न घेता ग्राहक यूज अँड थ्रो कपमध्ये घेणे पसंत करत आहेत. 

पारेवाडी येथील नागरिक राहुल महामुनी म्हणाले, हॉटेलसारखी ठिकाणे वर्दळीची असतात. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने सध्या तरी स्वतःची सुरक्षितता म्हणून वर्दळीच्या ठिकाणी जाणे टाळत आहे. 

केत्तूर येथील हॉटेल व्यावसायिक नंदकिशोर जोशी म्हणाले, कोरोनापूर्वीचा हॉटेल व्यवसाय आणि आता कोरोनानंतरचा हॉटेल व्यवसाय यामध्ये जमीन-आस्मानचा फरक पडला आहे. ग्राहक संख्या अल्प झाली आहे, त्यामुळे या व्यवसायापासून रोजगार मिळणेही अवघड झाले आहे. 

हॉटेल व्यावसायिक रमेश खैरे म्हणाले, हॉटेलमधील पार्सल सेवेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. तर करमाळ्याचे रहिवासी साबीर तांबोळी म्हणाले, हॉटेलमध्ये जेवण किंवा नाश्‍ता करण्यापेक्षा घरीच केला तर ते सर्वजण खातात. त्यामुळे जेवण व नाश्‍ता घरीच करणार. यापुढे घरीच करायचे ठरवले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com