पीक विमा भरपाईसाठी विमा कंपनीची टोलवाटोलवी

tur.jpg
tur.jpg

मंगळवेढा(सोलापूर)ःकोरोनामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. मागील वर्षी म्हणजे 2019 च्या खरिपातील तुरीच्या पीक विम्यापासून तालुक्‍यालाच वगळल्याने खरिप पेरणीसाठी तयारीत असलेल्या 19 हजार 473 शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली. 

नदीकाठचा शेतकरी वगळता तालुक्‍यातील सर्व शेतकरी हे खरीप आणि रब्बी पिकावर गुजराण करीत आहेत. गतवर्षी खरिपाच्या पीक विमा योजनेत बाजरी, सूर्यफूल पिकासाठी नुकसानभरपाई विमा कंपनीने दिली. पण त्याच हंगामात तुरीला वगळले गेले. गेल्या दोन वर्षात तुरीला हमी भावामुळे मिळालेल्या वाढीव दरामुळे तुरीचे क्षेत्र तालुक्‍यात वाढले. पण इतर पिकांबरोबर तुरीचा विमा देण्याची वेळ येताच ग्रो इन्शुरन्स विमा कंपनीने वेगळे निकष लावत तालुक्‍यातील 7 महसूल मंडळमधील जवळपास 19 हजार 473 शेतकऱ्यांना भरपाईच्या लाभापासून वगळले. 

या प्रकरणात झालेल्या अन्यायाबाबत विमा कंपनीच्या मुंबई कार्यालयातील एका अधिकाऱ्याने दुजोरा देत कबुलीच दिली. तूर उत्पादक शेतकरी वगळल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अशा परिस्थितीत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीला विमा देणार असल्याचे सुतोवाच केले. त्यामुळे अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याचे स्पष्ट होत आहे. 
2017 मध्ये संपूर्ण तालुका वगळला गेला तर खरीप हंगाम 2018 मध्ये देखील विमा कंपनीने तूर पिकाला चुकीचे निकष लावत 4012 शेतकऱ्यांवर विमा कंपनीने अन्याय केला. नंतर आंदोलनाच्या माध्यमातून ही रक्कम पदरात पाडून घेतली. तर मृग बहार 2019 मध्ये डाळिंब पिकाची भरपाई देताना विमा कंपनीने प्रत्येक महसूल मंडळाला वेगवेगळी भरपाई दिली. त्यामध्ये देखील तीन मंडळातील शेतकरी वगळले. तेही अजून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. 
त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या मागे असलेले शुक्‍लकाष्ठ संपत नाही अशी स्थिती झाली आहे. दुष्काळी परिस्थितीत पाण्याअभावी सर्वच पिके वाया गेली असताना कंपनीने फक्त 19 हजार 439 बाजरी उत्पादक शेतकरी , 1368 मका उत्पादक व 9हजार 93 सूर्यफूल उत्पादक शेतकऱ्याला भरपाई दिली. त्यावर शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे करून घेतली. आता पेरणीसाठी तूर पीक विम्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यावर मात्र पेरणीसाठी कर्ज काढण्यासाठी बॅंक शोधण्याची वेळ आली. 

तूर पिकाचे विमा कंपनीला वावडे का आहे 
बाजरी व सूर्यफूल पिकाची भरपाई देणाऱ्या विमा कंपनीला तूर पिकाचे वावडे का ? हे समजत नाही. जर भरपाई देता येत नसेल तर तुरीचा विमा भरून घेतलाच कशाला ? हा शेतकऱ्यांचा प्रश्‍न आहे. अशा प्रकारातून विमा कंपन्या शेतकऱ्यांना पायदळी तुडवून गलेलठ्ठ होऊ लागल्या आहेत. 
- श्रीकांत पाटील शेतकरी सलगर बुद्रुक 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com