शेतकरी संघटनेची राज्यात शनिवारपासून जनप्रबोधन यात्रा : ऊस उत्पादकांचा प्रश्‍न एैरणीवर 

shetkari sanghtanalogp.jpg
shetkari sanghtanalogp.jpg

दक्षिण सोलापूर (सोलापूर)ः शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवार (ता.28) पासून जनप्रबोधन पंधरवाडा पाळण्यात येणार असून त्यानिमित्त पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून जनप्रबोधन यात्रेचे आयोजन केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी (ता.24) पत्रकार परिषदेत दिली. 

महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृतीदिनापासून जनप्रबोधन पंधरवडा व यात्रा सुरू करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून सुरूवात झालेली ही यात्रा इचलकरंजी, सांगली, इस्लामपूर, पलूस, कडेगाव, आटपाडी या मार्गे 4 डिसेंबरला सोलापूर जिल्ह्यात येणार आहे. दोन दिवस सोलापूर जिल्ह्यात ती असणार आहे. त्यानंतर नगर, पुणे या जिल्ह्यातून फलटण, वाई, कराड येथील कार्यक्रम संपवून सातारा येथे यात्रेचा समारोप होणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

1980 सालापासून शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या. आता दररोज महाराष्ट्रात 12 ते 13 व देशात 40 ते 45 शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्याला लागणाऱ्या सर्व वस्तूंच्या किंमती वाढल्या परंतु त्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या किंमती वाढू दिल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. 
साखर कारखान्यांचे गाळप सूरू झाले असताना आज फक्त एफआरपीच्या चर्चा सुरू आहेत. ऊसापासून तयार होणाऱ्या उपपदार्थांच्या किंमती आणि उत्पादनाची चर्चा होत नाही. सि. रंगाराजन यांच्या शिफारसीनुसार साखर कारखान्यात तयार होणाऱ्या साखर, बगॅस, मोलॅसीस, प्रेसमड त्यांच्या विक्रीतून येणाऱ्या रकमेपैकी 70 टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली पाहिजे. उपपदार्थ असणाऱ्या कारखान्यांनी 75 टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली पाहिजे. यासाठी "ऊस दर नियंत्रण समिती' स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. कृषि, अर्थ, सहकार सचिव व साखर आयुक्त असे पाच आयएएस अधिकारी या समितीत आहेत. पाच साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व पाच शेतकरी प्रतिनिधी अशी या समितीची रचना आहे. परंतु गेली दोन वर्षे या समितीची बैठकच नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांना प्रतिटन एक हजार रुपये कमी मिळत आहेत. एफआरपी एकरकमी 14 दिवसांत मिळाली पाहिजे असा कायदा आहे. उपपदार्थांच्या किंमतीचा वाटा ऊस उत्पादकाला मिळाला पाहिजे. याबाबतची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यास करून देण्यासाठी ही प्रबोधनयात्रा असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. यावेळी रामभाऊ सालवडे, संभाजी पवार, सुभाष चौगुले, संगमेश्‍वर केदार, हणमंत चौगुले उपस्थित होते. 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com