अवघ्या चाळीस दिवसांत घटला "उजनी'चा 31 टक्के पाणीसाठा ! लाभक्षेत्रातील शेतकरी चिंतेत

Ujani Dam
Ujani Dam

केत्तूर (सोलापूर) : गतवर्षी झालेल्या दमदार पावसाच्या बळावर उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरून पावसाळ्यात धरणात अतिरिक्त झालेले पाणी खाली सोडून देण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात उजनी धरण क्षेत्रातील शेतकरी खुशीत व आनंदी होता. परंतु, उन्हाळ्याच्या प्रारंभीच त्याची ही खुशी सपशेल फोल ठरण्याची शक्‍यता वाढली आहे. जानेवारीअखेर उजनी जलाशयाचा पाणीसाठा 101 टक्के होता; परंतु सोलापूरसाठी 19 जानेवारी ते 27 फेब्रुवारी या 40 दिवसांच्या काळात उजनी जलाशयातून नदी, कॅनॉल, बंधारे व बोगद्याद्वारे पाणी सोडल्याने पाणीसाठा एकदम पहिल्या फेरीतच 31 टक्के कमी झाला आहे. 

जलाशयातील पाणी नदीद्वारे सोडल्याने नेहमीच उजनीचे पाणी पोटात जाते, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊनही व उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरूनही एकाच फेरीत (आवर्तनात) उजनीचे 31 टक्के पाणी कमी होणे यासारखा विनोद दुसरा नाही. एवढे पाणी कुठे मुरते, हाच प्रश्न मूळ धरणग्रस्तांना पडला आहे. त्यामुळे यापुढे तरी उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे; अन्यथा पुढील आवर्तनानंतर उजनीचा पाणीसाठा वजा 28 टक्‍क्‍यांवर जाणार, हे भविष्य (अंदाज) खरे ठरण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

एकूणच, भरपूर पाणीसाठा असतानाही यावर्षी शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे, असेच संकेत मिळत आहेत. 111 टक्के म्हणजेच पूर्ण क्षमतेने भरलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा सध्याच्या घडीला 68.48 टक्के एवढा झाला असून, नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे. उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवनही होत आहे. 

त्यातच सोलापूरसाठी एप्रिल महिन्यात व त्यापुढे अजून दोन आवर्तने सोडली जाणार आहेत. त्यामुळे उजनी पूर्ण क्षमतेने भरूनही यावर्षीही रिकामे कमी होण्याचे संकेत मिळत असल्याने मूळ धरणग्रस्तांची पिके जगवण्यासाठी परवड होणार आहे. गतवर्षी सोलापुरात सर्वत्रच जोरदार पाऊस झाल्याने यंदा उन्हाळा सुखकर जाणार असा अंदाज होता. परंतु तो अंदाजही चुकणार आहे. मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा कमी झाल्याने सखल भागातील शेतकऱ्यांना पिके जगविण्यासाठी मोटारी, केबल, पाईप वाढवावे लागत आहेत. त्यासाठी ऐन आर्थिक टंचाईच्या काळात मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यातच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी वीज वितरण कंपनीकडून शेतीसाठी सात ते आठ तासच वीजपुरवठा केला जात आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने व उजनी जलाशयामध्ये भरपूर पाणी असल्याने परिसरात उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. 

पाण्याचा अपव्यय टाळावा 
उजनी धरणातील बहुतांश पाणी हे राजकीय हस्तक्षेपामुळे वाया जाते. सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातच सोलापूरला पाणी सोडल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होतो. त्याला आळा घालणे गरजेचे आहे. नागरिकांनीही पाणी वाया न जाऊ देता पाण्याचा जपून वापर करावा. 

दरम्यान, पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने जलाशयाच्या सखल भागातील पाणथळ तसेच दलदलीच्या जागा रिकाम्या झाल्याने या ठिकाणी देशी- विदेशी पक्षी यापुढे मोठ्या संख्येने येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तसेच उजनीचे मुख्य आकर्षण असणारे फ्लेमिंगोही निश्‍चितच उशिराने का होईना येतील, असे पक्षी निरीक्षक, पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार व कल्याणराव साळुंके यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

उजनीची सद्य पाणी स्थिती... 

  • एकूण पाणीसाठा : 3841.74 दलघमी (108 टीएमसी) 
  • आजचा उपयुक्त पाणीसाठा : 1038.93 दलघमी (36.69 टीएमसी) 
  • पाणी पातळी : 495.310 मीटर 
  • टक्केवारी : 68.48 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com