पूर्णवेळ लॉकडाउनमुळे होईल जगणे मुश्‍कील ! मास्क वापरणाऱ्यांना कोरोनाचा धोका कमी 

mask
mask

सोलापूर : पुन्हा एकदा कडक लॉकडाउन कोणालाही परवडणारा नसून अनेकांचे त्यात मोठे नुकसानच होणार आहे. त्यामुळे हातावरील पोट असलेल्यांसह अनेकांचे जगणे मुश्‍किलीचे होईल. या पार्श्‍वभूमीवर सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याची आता खूप मोठी गरज निर्माण झाली आहे. मास्क वापरणे हा कोरोना जवळ येऊ न देण्याचा ठोस उपाय ठरू शकतो, असा विश्‍वास सोलापूरकरांनी व्यक्‍त केला आहे. 

अनलॉकनंतर प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे झाले नाही. विवाह असो वा राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांमध्येही मोठी गर्दी पाहायला मिळाली. अजनूही असे प्रकार थांबलेले नाहीत. मात्र, आता मोठ्या कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक करण्यात आल्याने त्यावर निर्बंध येतील, असा विश्‍वास वाटू लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवस नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास निश्‍चितपणे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबेल, असा विश्‍वासही व्यक्‍त केला आहे. कडक लॉकडाउन केल्यानंतर अनेकांचे जगणे कठीण होणार आहे. त्यामुळे सर्वांनी आतापासूनच नियमांचे पालन करीत मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता ठेवल्यास कोरोनाला आळा बसणार आहे. कोरोनासंबंधीची लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घेणे आवश्‍यक आहे. लक्षणे असलेल्यांनी इतरांपासून दूर राहायला हवे, जेणेकरून त्याचा परिणाम इतरांवर होणार नाही. प्रत्येकाने स्वत:बरोबरच कुटुंबातील सदस्यांचीही काळजी घ्यायला हवी. 

अर्थव्यवस्था सुधारू लागली; लॉकडाउनमुळे पुन्हा अडचणी वाढतील 
राज्याची अडचणीत आलेली अर्थव्यवस्था आता पूर्वपदावर येऊ लागली आहे. पुन्हा कडक लॉकडाउन केल्यास अडचणी आणखी वाढतील. वारंवार लॉकडाउन करणे हा कोरोनाला रोखण्याचा तात्पुरता उपाय असून नियमांचे पालन करणे हाच अंतिम उपाय ठरू शकेल. कोरोनाला मुळापासून घालविण्यासाठी नियम पाळावेच लागतील. 
- सविता भांगे, 
मुख्याध्यापिका 

लॉकडाउनमुळे अडचणी वाढून गुन्हेगारी वाढेल 
शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी लॉकडाउन ठीक आहे. मात्र, ज्यांचे जगणे महाग आहे, त्यांच्यासाठी लॉकडाउन खूप कठीण आहे. त्यांचे नैराश्‍य वाढल्यास भांडण, चोरी, मारामारी असे प्रकार वाढू शकतात. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करायलाच हवे. 
- शीतल महिमाने, 
शिक्षिका 

...तर नक्‍की आपण ही लढाई जिंकू 
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी वारंवार तात्पुरते उपाय कोणत्याही घटकासाठी फायदेशीर ठरणार नाहीत. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता या तीन उपायांचे पालन केल्यास कोरोनाला निश्‍चितपणे आपण हरवू शकतो. आणखी काही दिवस काटेकोरपणे नियम पाळल्यास ही लढाई आपण नक्‍की जिंकू. 
- मोहिनी डोंगरे 

नियमांचे पालन करावेच लागेल 
लॉकडाउन टाळायचे असेल तर प्रत्येकाने स्वत:बरोबरच कुटुंबाची जबाबदारी घ्यायला हवी. कोरोनासंबंधीचे जे निर्बंध आहेत, त्याचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोना वाढणार नाही; जेणेकरून हातावरील पोट असलेल्यांसह अनेकांसमोर प्रश्‍न निर्माण होणार नाहीत. 
- करुणा गुरव, 
शिक्षिका 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com