21 वर्षांपासून रखडलेला मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळचा पाणी प्रश्न मार्गी

mangalvedha
mangalvedha
Updated on

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्याचे राजकारण हे नेहमी पाणी भोवती फिरत राहिले, त्यातीलच बहुचर्चित म्हैसाळ योजनेचे पाणी तब्बल 21 वर्षांनंतर शिरनांदगी तलावात आल्यामुळे दक्षिण भागातील शेतकऱ्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.

1999 नंतर तालुक्यात पाणी प्रश्नावर अधिक चर्चा सुरू झाल्या, त्यामध्ये अरळी बंधाऱ्याचे पाणी तेल धोंड्याला तर गुंजेगाव बंधाऱ्याचे पाणी चाळीस धोंड्याला व म्हैसाळ योजनेचे पाणी दोड्डा नाल्यातून मंगळवेढ्याला देण्यासंदर्भात सुतोवाच केले. त्यानंतरही शासनस्तरावरून चालढकल करण्यात आल्यामुळे मंगळवेढ्यात सर्वपक्षीयाच्या वतीने या तीन योजनेसह उजनीचे पाणी मंगळवेढ्याला मिळावे, म्हणून तीन दिवस मंगळवेढा बंद करण्यात आला होता.

तत्कालीन पालकमंत्री स्व आर.आर.पाटील यांच्या मध्यस्थीने या बंद वर तोडगा काढण्यात आला. त्यानंतर तेल धोंडा व चाळीस धोंडा या दोन्ही योजना सरकारने नाकारल्या आणि म्हैसाळ योजना स्वीकारली.परंतु 1999 ते 2009 पर्यंत रा. काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे सरकार होते. परंतु या योजनेला 10 वर्षात अपेक्षित गती मिळाली नाही. मतदार संघ पुर्नरचेनंतर आ.भालकेनी पाठपुरावा केला, दरम्यान 2014 मध्ये राज्यात व देशात सत्तांतर झाले.

या योजनेचे पाणी तालुक्याला मिळावे म्हणून आ.भारत भालके विधानसभेत सातत्याने मा.आ.गणपतराव देशमुख यांच्या सोबतीने आवाज उठवत राहिले. त्यामुळे या योजनेसाठी पंतप्रधान सिंचन योजनेतून जवळपास 2 हजार पेक्षा अधिक कोटीची तरतूद करण्यात आल्यामुळे कामाला गती मिळाली. गतवर्षी या योजनेचे पाणी तालुक्याला मिळणे अपेक्षित होते. परंतु काही ठिकाणी कामे अर्धवट राहिल्यामुळे पाणी लांबले. स्थानिक आमदार व शासन हे विरोधी असल्याने पाणी देण्याबाबत राजकीय श्रेयवाद झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

सध्या कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगलीला पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, अतिरिक्त पाणी वाहून वाया जाण्यापेक्षा हे पाणी दुष्काळी भागाला देण्यासंदर्भात शासनाने प्राधान्य दिले. हे पाणी म्होबाळ योजनेतून देण्याचा निर्णय घेतला. ते पाणी गेल्या दोन-तीन दिवसात तलावात येण्याची चर्चा असताना हे पाणी बंद झाले. त्यामुळे पुन्हा मागचे पाढे पंचावन्न का? असा सूर शेतकऱ्यांनी व्यक्त होत असतानाच त्याच्या भावना सकाळ'ने बातमीच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या. त्यानंतर पुन्हा पाणी सोडण्यात आले.

सुरुवातीला 70 क्युसेसचा विसर्ग होता. तो काल रात्री 125 करण्यात आला. त्यामुळे वेगाने पाणी सध्या शिरनांदगी तलावात आले. त्यामुळे गेल्या 21 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या तालुक्याला अखेर म्हैसाळ योजनेचे पाणी मिळाल्यामुळे दक्षिण भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर पसरली, शिवाय आ. भारत भालके यांनी केलेल्या पाठपुराव्याचे व शासनाने तरतूद केलेल्या निधीमुळे या योजनेचे पाणी तालुक्याला मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

म्हैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील म्हणाले, 325 द.ल.घ.मी क्षमता असलेल्या शिरनांदगी तलावात सध्या 125 दिशेने पाणी सोडण्यात येत आहे. पाण्याचा विसर्ग सध्या तरी कायम आहे. त्यामुळे तलाव भरणे शक्य होईल.

पंढरपूर मंगळवेढ्याचे आ.भारत भालके म्हणाले, पाणी सोडल्यानंतर झालेली गळती दूर झाल्यामुळे 21 वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान लाभले. भविष्यात तलावात पाणी कायम सोडण्याच्या दृष्टीने चेंबर बसण्यासाठी व या योजनेपासून वंचित असलेल्या इतर गावांना देखील पाणी मिळवून देण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा यापुढील काळात कायम राहील. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com