ई-पास रद्दनंतर उठली जिल्हाबंदी ! रेल्वे अन्‌ पोलिसांनी घेतले 'हे' निर्णय

0indian_railway66666_0 - Copy.jpg
0indian_railway66666_0 - Copy.jpg

सोलापूर : कोरोना कालावधीत राज्य सरकारने आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातली होती. ई-पासविना कोणालाही प्रवास करण्यास परवानगी नव्हती. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर 29 ठिकाणी ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी पॉईंट उभारले होते. तर 214 मार्गांवरही पोलिसांचा बंदोबस्त होता. दुसरीकडे शहर पोलिसांनी आठ ठिकाणी नाकाबंदी पॉईंट उभारले होते. आता राज्य सरकारने ई-पास बंदचा निर्णय घेतल्यानंतर सर्व मार्ग वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. तर रेल्वे प्रशासनाने सध्या सुरु असलेल्या गाड्यांचे बुकिंग घेण्यास सुरवात केली आहे.


शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात तथा एका शहरातून कोरोनाचा संसर्ग दुसऱ्या शहरात वाढू नये, या हेतूने राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्यानंतर मोदी सरकारने ई-पास रद्दचा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोमवारी (ता. 31) ई-पास बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात तथा शहरात येणाऱ्या मार्गांवरील पोलिसांची नाकाबंदी पूर्णपणे उठविण्यात आली आहे. दरम्यान, सोलापूर ग्रामीणमधील तब्बल 100 पोलिसांनी 24 मार्चपासून कोरोना योध्दा म्हणून नाकाबंदीची ड्यूटी केली. तर शहर पोलिसांनीही उत्तम कामगिरी बजावत विनापरवाना प्रवास करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज नसल्याने कोणत्याही पासविना कुठेही प्रवास करता येणार आहे.

सव्वादोन लाख लोकांनी ई-पासवरुन केला प्रवास
लॉकडाउनंतर जिल्हाबंदी जाहीर करण्यात आली होती. आंतरजिल्हा प्रवासासाठी प्रवाशांना ई-पासची सक्‍ती करण्यात आली होती. लॉकडाउन काळात जिल्ह्यातील तब्बल दोन लाख 74 हजार 935 जणांनी ऑनलाइन अर्ज करीत पासची मागणी केली. त्यापैकी दोन लाख 11 हजार 55 प्रवाशांना ई-पास वितरीत करण्यात आला. तर 63 हजार 880 व्यक्‍तींचे अर्ज नामंजूर करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. आता राज्य सरकारच्या निर्णयानुसार कोणत्याही पासविना नागरिक कुठेही प्रवास करु शकणार आहेत.


रेल्वेचे ऑनलाइन व स्थानकांवर बुकिंग सुरु
-पास रद्दचा निर्णय झाल्यानंतर रेल्वे विभागाकडून राज्याअंतर्गत प्रवासासाठी प्रवाशांचे बुकिंग सुरु केले आहे. सोलापूर विभागातून सध्या मुंबई- गदग, मुंबई-बंगळरु उद्यान एक्‍स्प्रेस, मुंबई- भुवनेश्‍वर कोणार्क एक्‍स्प्रेस आणि मुंबई- हैदराबाद विशेष एक्‍स्प्रेस या चार रेल्वे धावत आहेत. जिल्हाबंदीमुळे या गाड्यांना राज्याअंतर्गत थांबा दिलेला नव्हता. आता जिल्हाबंदी उठविल्यानंतर या रेल्वे गाड्या राज्यातील त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी थांबतील. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर रेल्वे स्थानकावरील आरक्षण कार्यालयात दोन शिफ्टमध्ये बुकिंग घेतले जात आहे. ऑनलाइन बुकिंगही सुरु करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदिप हिरडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com