कुर्डू (सोलापूर) : शेतकऱ्यांच्या शेती मालाला चांगला भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये गेले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम होईल, असा सल्ला आमदार बबनराव शिंदे यांनी दिला. ते विठ्ठलगंगा शेतकरी उत्पादक कंपनीच्या अद्ययावत फूड प्रोसेसिंग युनिट व सुसज्ज पॅक हाउसच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते.
या वेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूरच्या संचालिका डॉ. ज्योत्स्ना शर्मा, द्राक्ष संशोधन केंद्र, पुणेचे संचालक डॉ. आर. जी. सोनकुवर, आमदार संजय शिंदे, द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष शिवाजी पवार, पलूसचे द्राक्ष तज्ज्ञ मारुती चव्हाण आदी उपस्थित होते.
आमदार शिंदे यांनी, शेतकऱ्यांनी फळबागा व भाजीपाला पिकांच्या लागवडीकडे वळावे. या संस्थेमुळे मध्यस्थाची साखळी कमी होणार असल्यामुळे शेतकरी सभासदांना चांगला भाव मिळेल, असा विश्वास व्यक्त करून, विश्वास ठेवून काम करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले.
डॉ. जोत्स्ना शर्मा यांनी डाळिंब पिकातील गुणवत्ता सुधार व मूल्यवर्धन याबद्दलचे फायदे शेतकऱ्यांना सांगितले. तसेच डॉ. आर. जी. सोनकुवर यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाला असणारी संधी यावर भाष्य केले. शिवाजी पवार, मारुती चव्हाण यांनीही मनोगते व्यक्त केली. या वेळी शेतकऱ्यांनी सभासद नोंदणीला चांगला प्रतिसाद दिला.
या वेळी चेअरमन धनराज शिंदे म्हणाले, सभासदांना चांगली सेवा देण्यासाठी सभासद नोंदणी मर्यादित ठेवणार असून, गरजू शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सभासद नोंदणी करून घ्यावी. सर्वोत्तम सेवा देण्यासाठी ही संस्था कायम कटिबद्ध राहणार आहे.
स्वागत व प्रास्ताविक चेअरमन धनराज शिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी श्रीकांत पाटील, डॉ. पाटील, रवींद्र शिंदे, नितीन कापसे, महेश मारकड, यशवंत भोसले, आनंद पानबुडे, सुजित भोसले, महेश डोके, नागनाथ शिंदे, राहुल वरपे, राहुल पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रा. प्रशांत कुंभार व रवींद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.