विजयी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये वाढली धाकधूक ! आता सरपंचपदाची माळ पडणार कोणाच्या गळ्यात?

sarpanch
sarpanch

केत्तूर (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुका शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या असल्या, तरी आता सरपंच कोण होणार? हे अद्याप गुलदस्त्यातच राहिले आहे. जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण 27 जानेवारीला जाहीर होणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे निवडणूक झालेल्या गावच्या नजरा आता 27 जानेवारीकडे लागल्या आहेत. 

18 जानेवारी रोजी तालुक्‍यातील 49 गावच्या निवडणुकीसाठी मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर झाला आणि गावागावांत विजयी उमेदवार व त्याच्या समर्थकांनी जल्लोष केला. सत्तांतरात बाजी मारली असली तरी आता सरपंच कोणाचा होणार? याची उत्सुकता व धाकधूक आहे. 27 जानेवारीला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले जाणार असल्याने सर्वांच्या नजरा या आरक्षणाकडे लागल्या आहेत. एकूणच, तालुक्‍यातील एकूण 51 ग्रामपंचायतींचे उमेदवार व तालुकावासीयांचेही लक्ष आरक्षणावर लागले आहे. 

निवडून आलेल्या उमेदवारांपैकी सर्वांनाच सरपंचपदाची आस लागली असल्याने पॅनेल प्रमुखाची मात्र कसोटी लागणार आहे. तर काही ठिकाणी सरपंच पदासाठी बंडखोरीही होणार आहे. या वेळी राजकारणात सर्व काही माफ असते, याचाही प्रत्यय मतदारांना येणार आहे. 

एकूणच, करमाळा तालुक्‍यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व राहावे यासाठी आरक्षण कसे पडते? हे पाहणे औत्सुक्‍याचे व कुतूहलाचे ठरणार आहे. आरक्षणानंतर फोडाफोडीच्या राजकारणालाही वेग येणार आहे. निवडून आलेल्या जागांपैकी आरक्षणाचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत, त्या ग्रामपंचायतींचा प्रश्न सध्यातरी मिटला असला तरी, काही ठिकाणी सत्ता एका गटाची आणि सरपंच दुसऱ्या गटाचा अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे विजयी उमेदवारांपैकी एकाला संधी मिळावी व आरक्षण तसेच पडावे यासाठी बहुतांश जणांनी देवाकडे प्रार्थना सुरू केली आहे. 

तालुक्‍यामध्ये या वेळेस नागरिकांनी तरुणांना संधी दिल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे गावचा कारभारी मात्र तरुण होणार आहे. निकालानंतर मात्र तालुका पातळीवर नेते व त्यांची समर्थक मंडळी एवढ्या ग्रामपंचायतींवर आमची सत्ता, एवढ्या ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आहेत, अशाप्रकारे दावे-प्रतिदावे करत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात ग्रामपंचायतींची संख्या मात्र रोजच वाढत चालली आहे. याकडे मात्र सर्वच राजकीय मंडळींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. जो तो आपल्या समर्थक ग्रामपंचायती वाढवण्याचाच प्रयत्न करीत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com