ग्रामविकास मंत्रालय अधिकाऱ्यांच्या प्रश्‍नांनी उडाली रानमसलेच्या ग्रामसेवक व गटविकास अधिकाऱ्याची भंबेरी 

Ranmasle
Ranmasle

वडाळा (सोलापूर) : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने सध्या सोलापूर जिल्ह्यात खर्च केलेल्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग झाला की नाही, यासाठी दिल्लीतून केंद्रीय अधिकारी तपासणीसाठी दाखल झाले आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांतून 20 गावे निवडण्यात आली असून यामध्ये 10 गावांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, रानमसले येथे या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांमुळे ग्रामसेवक व गटविकास अधिकाऱ्याची मात्र भंबेरी उडाली. 

आतापर्यंत उत्तर सोलापूर तालुक्‍यातील रानमसले, एखरुक, राळेरास, हिप्परगा या गावांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणी अहवालानंतरच अनेक योजनांचे भवितव्य ठरणार आहे. काल पहिल्याच दिवशी दुपारनंतर दिल्लीचे विकासकुमार रानमसलेत (ता. उत्तर सोलापूर) येथे दाखल झाले. या वेळी गटविकास अधिकारी डॉ. जास्मीन शेख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, विस्तार अधिकारी एस. बी. पाथरवट, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे शाखा अभियंता पी. एच. कुलकर्णी, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे दत्तात्रय कुलकर्णी, कृषी सहाय्यक सुवर्णा साखरे, ग्रामसेविका सुजाता व्हनकडे, सरपंच वैशाली गरड, सोनम गजघाटे, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी कुंभार आदी उपस्थित होते. 

या वेळी रानमसले ग्रामपंचायतकडून राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजना, एमआरईजीएस अंतर्गत किती मजुरांना प्रत्यक्षात रोजगार मिळाला याची चौकशी करण्यात आली. गावातील आरोग्य सुविधा, स्वच्छता व पाणीपुरवठा तसेच प्रधानमंत्री सडक योजना अशा केंद्रशासित योजनांचा पैसा व ग्रामीण विकासात वापरलेल्या योजनांचे मूल्यमापन करण्यात आले. 

या अधिकाऱ्यांनी उमेद अंतर्गत बचत गटातील योजनेच्या आर्थिक बाबींची सखोल माहिती घेत नोंद घेतली. रानमसलेतील विकासकामात खर्च केलेल्या दप्तर तपासणी दरम्यान अर्धवट माहितीमुळे ग्रामसेवक व ग्राम स्वयंरोजगार सेवक यांना दुसऱ्या दिवशी सकाळी तातडीने माहिती देण्यास सांगितले. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत केलेल्या विकास कामांदरम्यान काही त्रुटी आढळल्यास तसाच अहवाल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. या वेळी या पथकास माहिती देताना ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसेवक हे अनेक नियमांच्या बाबतीत अनभिज्ञ असल्याने या वेळी तारांबळ उडाली. 

नाराजी अन्‌ खडे बोल..! 
रानमसलेत केंद्रीय पथकाचे अधिकारी विकास कुमार यांनी एकूण कुटुंबांपैकी किती कुटुंबांकडे शौचालय आहेत, असा प्रश्‍न विचारला. त्या वेळी ग्रामसेविकेने 90 टक्के कुटुंबांकडेच शौचालये असल्याचे सांगितले, तर दुसरीकडे गटविकास अधिकाऱ्यांनी 100 टक्के कुटुंबांकडे शौचालये असल्याचे सांगितले. यावर ग्रामपंचायत कार्यालयात शौचालय आहे का? या प्रश्नावर मात्र "नाही' असे उत्तर मिळाल्याने, यावर अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ग्राम विकासात नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याऐवजी फक्त रस्ते, मंदिर, मशीद, सभामंडप दुरुस्त्या यावर खर्चाऐवजी लोकांसाठी शौचालये बांधा, असे खडे बोल सुनावले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com