वारीची आठवण म्हणून घरासमोर विठ्ठलरूपी वृक्ष लावा

 Plant a Vitthal tree in front of the house to commemorate Wari
Plant a Vitthal tree in front of the house to commemorate Wari

वेळापूर (जि. सोलापूर) : यंदा कोरोनामुळे आषाढी वारी चुकली असली तरी वारीची आठवण म्हणून "वृक्षवल्ली आम्हा सोयरे' या संतवचनाप्रमाणे राज्यातील प्रत्येक वारकऱ्यांनी आषाढी एकादशीला सकाळी 11 वाजता आपल्या घरासमोर विठ्ठलरूपी वृक्षाची लागवड करून श्री विठ्ठल दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिनेअभिनेते व सह्याद्री वनराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी केले.


सह्याद्री वनराई संस्था, श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समिती पंढरपूर, श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी आळंदी, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या वतीने देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी तळावर सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समितीचे विश्‍वस्थ शिवाजी मोरे, श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीचे अध्यक्ष ऍड. विकास ढगे-पाटील, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे, सोहळाप्रमुख अजित मोरे, महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांच्यासह गावोगावचे सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. 


सिनेअभिनेते शिंदे म्हणाले, वारकऱ्यांना यंदा कोरोनामुळे आषाढी वारीला येता आले नाही याचे दु:ख आहे. हे दु:ख विसरायचे असेल तर जो वृक्ष आपणाला जगण्याची ऊर्जा देतो. त्याची आपल्या दारात, शेतात, गावात लागवड करून त्याची पांडुरंग परमात्मा म्हणून पूजा करा व जसे रोज तुळशीला पाणी घालता तसे त्या वृक्षाला घाला. तो तुम्हाला आयुष्यभर जगण्याची ऊर्जा देईल. झाडे लावताना वड, पिंपळ, लिंब, चिंच, उंबर, आंबा, आवळा, जांभूळ याच देशी झाडांची लागवड करा असे ते म्हणाले. 


संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात सुमारे 450 दिंड्या आहेत. या दिंड्यांतील वारकऱ्यांनी आपल्या गावी तर पालखी मुक्कामाच्या गावात पालखी तळावर वृक्षलागवड करावी, असे आवाहन ऍड. विकास ढगे-पाटील यांनी केले. 


संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात 329 दिंड्या आहेत. या दिंडीकऱ्यांना वृक्ष लागवडीसाठी संपर्क केला आहे. प्रत्येक दिंडी प्रमुखांनी एकादशी दिवशीच वृक्षलागवड करावी, असे आवाहन अध्यक्ष मधुकर मोरे यांनी केले. 

15 लाख झाडे लावण्याचा संकल्प 
राज्यभरातून येणाऱ्या सुमारे 15 लाख वारकऱ्यांनी आपापल्या गावी 15 लाख झाडे लावण्याचा विठ्ठलचरणी संकल्प केला असल्याचे हरित वारीचे प्रणेते व श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समितीचे विश्‍वस्थ शिवाजी मोरे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com