कोरोना काळात फेक कॉलला वैतागले पोलिस ! 100 नंबरवर विनाकारण कॉल केल्यास दाखल होणार गुन्हा

3sakal_exclusive_1.jpg
3sakal_exclusive_1.jpg

सोलापूर : राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉक केल्यानंतर चोरट्यांनी 'पुन:श्‍च आरंभ' करीत शहरातील बंद दुकाने, घरात कोणी नसलेल्या घरांना टार्गेट केले आहे. मागील पाच महिन्यांत तब्बल दीडशेहून अधिक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. दोन कोटींपर्यंतचा मुद्देमाल चोरीला गेला असून त्यातील काही प्रकरणात पोलिसांनी चोरट्यांना पकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. दुसरीकडे पोलिस आयुक्‍तालयातील कंट्रोल रुमच्या माध्यमातून 100 नंबरवर आलेल्या कॉलनुसार संबंधित ठिकाणी पोलिस कारवाईसाठी पोहचतात. मात्र, बहुतेकवेळा त्याठिकाणाहून फेक कॉल येत असल्याने पोलिस त्रस्त झाले आहेत.

खोटी माहिती दिल्याचा गुन्हा दाखल होईल
पोलिस आयुक्‍तालयातील कंट्रोल रुमकडे दररोज तीन हजारांहून अधिक कॉल येतात. त्यात रात्रीचे सुमारे साडेसातशे कॉल असतात. मात्र, त्यातील बहूतांश कॉल (70 टक्‍क्‍यांपर्यंत) विनाकारण केलेले असतात, असे निर्दशनास आले आहे. त्यामुळे विनाकारण कॉल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
- डॉ. वैशाली कडूकर, पोलिस उपायुक्‍त, सोलापूर

शहरातील चोरीचे प्रमाण वाढू लागल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात पोलिसांची 21 चारचाकी वाहने नियुक्‍त करण्यात आली आहेत. तर 50 दुचाकी (बीट मार्शल), 12 पेट्रोलिंग मोबाइल, एक पोलिस उपायुक्‍त व सहायक पोलिस आयुक्‍त दर्जाचे अधिकारी नियुक्‍त केले आहेत. शहरातील प्रत्येक नगरांमधील गल्ली- बोळात पोलिसांनी गस्त घालणे कठीण आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक राहून घरातील सोने, महागड्या वस्तू, रोख रक्‍कम बॅंकेतील लॉकरमध्ये ठेवायला हवे, असे आवाहन पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर यांनी केले आहे. दुकानदारांनी ब्रग्लर अलार्म बसवावा, असेही त्यांनी सांगितले. आता पोलिसांना 100 नंबरवरून दररोज तीन हजारांहून अधिक कॉल येतात, मात्र त्यातील 70 टक्‍के कॉल बिनकामाचे असतात, असेही त्या म्हणाल्या. सदर बझार पोलिस ठाण्यात एका 40 वर्षीय व्यक्‍तीविरुध्द पोलिसांना खोटी माहिती दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरा नगरात भांडण सुरु असल्याची माहिती 100 नंबरवरुन दिली आणि मोबाइल बंद करुन ठेवला, अशी फिर्याद बीट मार्शलने दिली आहे. त्यामुळे विनाकारण कॉल केल्याने खरोखर गरज असलेल्यांना वेळेत मदत मिळू शकत नाही. या पार्श्‍वभूमीवर विनाकारण कॉल करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाईल, असेही कडूकर यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.


'डायल 112'नागरिकांचा मिटेल प्रश्‍न
सध्या ग्रामीण आणि शहर पोलिसांच्या मदतीसाठी नागरिकांना 100 नंबरवरच कॉल करावा लागतो. त्यामुळे अनेकदा ग्रामीण भागातील कॉल शहरातील पोलिसांना येतात. मात्र, 'महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम'च्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्‍न सुटावेत म्हणून शासनातर्फे डायल- 112 हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याचे काम सुरु असून काही दिवसांत या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र कॉलची व्यवस्था होऊन अडचणीतील नागरिकांना तत्काळ मदत करणे सोयीस्कर होणार आहे. त्याअंतर्गत पोलिसांना आलेला कॉल कुठून आला, त्या परिसरात कोण बिट मार्शल आहे, याची माहिती तत्काळ स्क्रिनवर समजणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com