पावसाने विश्रांती घेतल्याने रब्बी पेरणीला येणार वेग

perani
perani

केतूर (सोलापूर) : ज्वारी आणि कांदा पिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या करमाळा तालुक्‍यात पावसाने विश्रांती घेतल्याने रब्बीच्या पेरणीला आता सुरुवात झाली आहे. करमाळा तालुक्‍यात चांगला पाऊस असल्याने यंदा देखील सरासरी इतके 1,06,412 हेक्‍टरवर रब्बीच्या पेरणीचे उद्दिष्ट आहे. करमाळा तालुक्‍यात जूनपासून उत्तम पाऊस असल्याने खरीप हंगाम यंदा जोमात आला. खरीप हंगाम साधल्याने उडदाचे भरघोस उत्पादन झाले. त्यामुळे आता रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

करमाळा तालुक्‍यातील ज्वारी आणि कांदा हे पीक सर्वाधिक घेतले जाते. गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने वाफसा होऊ लागला असून पेरणीला वेग येणार आहे. ज्वारीच्या पेरणीबरोबर कांदा लागवडीला आता सुरुवात होणार असून अनेक ठिकाणी कांदा रोप लागवडीसाठी तयार झाली आहेत. एकूण रब्बी क्षेत्रापैकी सरासरी 98,967 हेक्‍टर ज्वारीचे असून कांदा 5,421 इतक्‍या हेक्‍टर इतका असण्याची शक्‍यता आहे. गहू आणि हरभरा आदी पिकांच्या पेरणीला आणखीन काही आठवडे विलंब आहे. 

महत्वाच्या नोंदी

करमाळा तालुक्‍यातील सरासरी रब्बी क्षेत्र ( ऊस वगळून) : 106412 हेक्‍टर 
पीक निहाय सरासरी क्षेत्र पुढीप्रमाणे: 
ज्वारी  98967 हेक्‍टर. 
गहू       2569 हेक्‍टर 
हरभरा  3563 हेक्‍टर 
मका     1075 हेक्‍टर 

करमाळ्याचे तालुका कृषी अधिकारी गणेश दुरदे म्हणाले, यंदा समाधानकारक पाऊस असल्याने वाफसा परिस्थिती निर्माण झाली की पेरण्यांना सुरुवात होईल. यंदा सरासरी इतकी पेरणी होण्याची शक्‍यता आहे.  

देलवडी येथील शिवाजी चाकणे म्हणाले, वाफसा असल्याने आता पेरणीला सुरुवात झाली आहे. यंदा देखील चांगला पाऊस असल्याने सरासरी इतकी पेरणी होणार आहे. ज्वारी पेरण्यासाठी लोकांची लगबग सुरू आहे. 
 

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com