सोलापूरकरांच्या माहितीसाठी : "या' कारणांमुळे विस्कळित झालाय पाणीपुरवठा !

Water Supply
Water Supply

सोलापूर : शहरवासीयांना एक-दोन दिवसांआड पाणीपुरवठा करू म्हणून सत्तेची निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना आता निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनाचा विसर पडल्याचे चित्र आहे. उन्हाळा असो की पावसाळा, बाराही महिने शहरात पाणी टंचाईचाच नागरिकांना सामना करावा लागत आहे. वर्षातील 100 दिवस पाणी मिळाल्यानंतर नागरिकांना 365 दिवसांची पाणीपट्टी द्यावी लागत आहे. त्यासाठी उजनी ते सोलापूर, टाकळी ते सोरेगाव, हिप्परगा ते भवानी पेठ या ठिकाणची जुनाट पाइपलाइन आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठाच कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. 

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी ते सोलापूर, टाकळी ते सोरेगाव, हिप्परगा ते भवानी पेठ अशा तीन योजना आहेत. मात्र, उजनीची योजना 1995 मधील असून टाकळीची योजना 1968 मधील तर, भवानी पेठेतील योजना 1938 मधील आहे. या तिन्ही योजना जुनाट झाल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. शहराला तीन दिवसांआड तर हद्दवाढ भागाला चार-पाच दिवसांआड पाणी मिळत आहे. दुसरीकडे 31 मार्चपासून उजनी पंपहाउसचा वीजपुरवठा तब्बल 42 वेळा तर टाकळी पंपहाउसचा वीजपुरवठा 46 वेळा खंडित झाला आहे. सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे पाणी उपसा करण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे जुन्या पाइपलाइनची गळती दुरुस्तीसाठीही वेळ जात आहे. आता यावर उपाय म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने 350 कोटींचा आराखडा तयार केला असून त्यानुसार कामे झाल्यास पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. 

"वितरण'कडे आयुक्‍तांचा सातत्याने पाठपुरावा 
शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व्हावा, यादृष्टीने सातत्याने आयुक्‍तांमार्फत प्रयत्न सुरू आहेत. ऑक्‍टोबर 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होता. मात्र, त्यानंतर वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने आणि जुनाट पाइपलाइनला सातत्याने गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला. त्यावर महापालिका आयुक्‍तांनी महावितरणला पत्र देऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 
- संजय धनशेट्टी, अभियंता, सार्वजनिक आरोग्य व पाणीपुरवठा, सोलापूर महापालिका 

विस्कळित पाणीपुरवठ्याचे प्रमुख अडथळे... 

  • टाकळी, पाकणी, भवानी पेठ, सोरेगाव, उजनी पंपहाउसवरील खंडित वीजपुरवठा 
  • पाइपलाइनला वारंवार गळती लागल्याने पाण्याचा होतोय मोठा अपव्यय, दुरुस्तीसाठी लागतोय वेळ 
  • टाकळी पाइपलाइनचा पाच किलोमीटरचा पट्टा बदलण्याची आहे गरज, त्याच ठिकाणी वारंवार गळती 
  • हद्दवाढ भागात लांबलचक पाइपलाइन, प्लास्टिक पीयूसी पाइपलाइनमुळे कमी दाबाने मिळते पाणी 
  • वारंवार वीज खंडित झाल्याने चार पंप सुरू करण्यास लागतो प्रत्येकी पाऊण तासाचा वेळ 

अशा करता येतील उपाययोजना 

  • उजनी, टाकळी, हिप्परगा या तिन्ही योजनांची कायमस्वरूपी दुरुस्ती केल्यास होईल सुरळीत पाणीपुरवठा 
  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आराखड्यानुसार शहरात उभाराव्यात 10 उंच टाक्‍या 
  • 350 कोटींच्या आराखड्यानुसार 164 किलोमीटरची पाइपलाइन नव्याने टाकल्यास नियमित मिळेल पाणी 
  • महावितरणने काढावा कायमस्वरूपी तोडगा; वीजपुरवठा खंडित होऊ नये याची घ्यावी दक्षता 
  • उपसा केलेले पाणी अन्‌ शहरवासीयांना मिळणाऱ्या पाण्यात तब्बल 80 एमएलडीची तफावत, गळती थांबवावी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com