VARI.jpg
VARI.jpg

....आमच्याही पायी वारी परंपरेचा ठेवा मान


नातेपुते(सोलापूर): लॉकडाउन संपल्याने आषाढी वारीसाठी निदान 10 वारकऱ्यांना पायी चालण्याची परवानगी देऊन या परंपरेचा मान राखण्याचे काम शासनाने करावे. पायी वारी ही वारकरी संप्रदायाची उपासना आहे, असे मत वारकरी संप्रदायातून व्यक्त होत आहे. 

हेही वाचाः विठुरायावर चौथ्यांदा होणार वज्रलेप 

महाराष्ट्र शासन व काही वारकरी सांप्रदायिक प्रतिनिधींनी यावर्षीची आषाढी पायी वारी कोरोना पार्श्‍वभूमीवर रद्द केली आहे. आरोग्यदृष्ट्या हा निर्णय योग्य असला तरी शेकडो वर्षांची पायी वारीची परंपरा खंडित होणार आहे. या निर्णयाने निष्ठावान वारकऱ्यांची मने भावनिक व हळवी झालेली आहेत. आता लॉकडाऊन संपले आहे. कडक नियमावली करून फक्त 10 वारकऱ्यांना पायी चालू देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी संप्रदायातून जोर धरू लागली आहे. 

कसलेही संकट असले तरीही महाराष्ट्रातील तमाम वारकरी वारीत सहभागी होतात. मुघलकाळ, ब्रिटिश राजवटीतही वारी रद्द झाली नव्हती. मात्र, कोरोना आजाराच्या परिणामांचा विचार करता वारी रद्द करण्यात आली. किमान 10 वारकऱ्यांना पायी चालण्यास परवानगी दिली तर शेकडो वर्षांची परंपरा मोडली नसती. सहभागी वारकऱ्यांच्या चाचण्या, सुरक्षित निवास व सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचा प्रस्ताव शासनास दिला होता. 
मात्र, काही विश्‍वस्त, महाराज मंडळी व तथाकथित पुढाऱ्यांनी वेळोवेळी शासनास संपर्क साधून पायी वारी रद्दच करावी अशी मागणी केली. सरकारलाही तेच हवे होते. वारकऱ्यांकडूनच असा प्रस्ताव आल्याने त्यांना पुढील निर्णय घेणे सोपे गेले. मात्र, हा निर्णय घेत असताना लाखो वारकरी नाराज झाले याचा विचार करण्यात आला नाही. परंतु, सर्व महाराष्ट्राच्या वतीने किमान 10 वारकरी तरी चालत जावेत ही भावना होती. 

पायी वारी ही वारकऱ्यांची उपासना 
पायी चालत साधना घडावी याकरिता ही वारकऱ्यांची साधनेची वारी प्रातिनिधिक स्वरूपात 10 वारकऱ्यांत होऊ शकते. शासनाने सकारात्मक निर्णय घ्यायला हवा होता. वारकरी संप्रदायाच्या भावना जपणे गरजेचे होते. काही सांप्रदायिक मंडळींनी शासनाची दिशाभूल केली आहे. लाखो वारकऱ्यांच्या भावना ओळखून ही परंपरा अबाधित ठेवावी. 
-राणा महाराज वासकर, संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा पदाधिकारी 

अजूनही वेळ गेलेली नाही 
राज्य सरकारने सर्वसुरक्षेचे नियम पाळत राखून पायी वारी सोहळ्याची परंपरा राखायला हवी होती. परंतु राज्य सरकारची आध्यात्मिक उदासीनता आणि वारकरी संप्रदायातील एकीचा अभाव दिसला. सामान्य वारकऱ्यासाठी पायी चालत येणे ही संप्रदायाची उपासना पद्धती आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. संतांच्या पादुका 10 वारकऱ्यांसह पंढरीला पायीच आणव्यात. 
-रामकृष्ण महाराज वीर, प्रवक्‍ते वारकरी संप्रदाय पाईक संघ 

हेलीकॉप्टर पेक्षा पायी वारी महत्वाची 
चातुर्मासाकरिता जैन मुनींना परवानगी मिळू शकते तशी फक्त 10 वारकऱ्यांना परवानगी मिळायला हवी होती. पादुका वाहन किंवा हेलिकॉप्टरने जातील. पण पायी वारीचा वारकरी संघटना, संस्थाने, फडकरींनी पुनर्विचार करावा. प्रत्येक वारकरी संस्थांवर विश्‍वस्त वारकरीच हवेत ही मागणी आता योग्य वाटू लागली आहे. 
- माधवदास महाराज राठी, संत साहित्य अभ्यासक 

आमची शिस्त व श्रध्दा पहावी 
नियमांच्या पायी वारकऱ्यांचे तप मोठे आहे. पंढरपूर- आळंदी येथील स्थानिक नागरिकांनी हे लक्षात घ्यावे की कदाचित या तपामुळे तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही अशी आमची श्रद्धा आहे. 
- अंकुश फुगे, नियमांचे वारकरी 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com