लॉकडाउन पुन्हा वाढणार! राज्यातील रुग्णसंख्या 50 हजारांवर

 लॉकडाउन पुन्हा वाढणार! राज्यातील रुग्णसंख्या 50 हजारांवर


सोलापूर : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 50 हजार 231 झाली आहे. तर कोरोना या विषाणूमुळे एक हजार 635 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूरसह राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने रेड झोन तथा रुग्ण वाढत असलेल्या भागातील लॉकडाउन आणखी काही दिवस जैसे थे राहणार आहे. तत्पूर्वी, सोलापूर पोलिस आयुक्तांनी 7 जूनपर्यंत लग्न समारंभ, अंत्ययात्रा, मिरवणुका, मोर्चे, रॅली काढणे, निवदने देणे, सभा घेणे, धरणे आंदोलन करण्यावर आणि बंदी घातली आहे. त्याबाबत रविवारी (ता. 23) आयुक्तालयाने आदेश जारी केला आहे.

राज्यात 22 मार्चपासून 31 मेपर्यंत चारवेळा लॉकडाउन जाहीर करुनही राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मालेगाव, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, सातारा, जळगाव, वसई-विरार, मिरा- भाईंदर, रायगड, पनवेल, अकोला या शहरांमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तिसऱ्या लॉकडाऊनपर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेला गडचिरोली जिल्हा आता रेड झोनकडे वाटचाल करीत असून  शनिवारपर्यंत त्या ठिकाणी 13 रुग्ण आढळले आहेत. राज्यात सध्या दोन हजार 283 प्रतिबंधीत परिसर आहेत. तर राज्यातील चार लाख 99 हजार 387 व्यक्ती होम क़्वारंटाईन असून आतापर्यंत तब्बल तीन लाख 63 हजार व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या लॉकडाउन काळात ज्या जिल्ह्यांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता, त्याठिकाणीही आता रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर 31 मेनंतरही काही दिवस लॉकडाउन 'जैसे थे' राहण्याची शक्यता बळावली असून राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाल्याने आता लॉकडाउन नेमके कुठे, कसे करायचे, याबाबत राज्य सरकारकडून ठोस नियोजन केले जात असल्याचीही चर्चा आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वीचा हा लॉकडाउन कसा, असणार याची उत्सुकता लागली आहे. 

जिल्हाबंदी आणखी काही दिवस कायम राहणार
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 1 जूनपासून दररोज 200 रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे ऑनलाइन बुकींगही सुरु झाले आहे. मात्र, राज्यात जिल्हाबंदी असल्याने राज्यातील राज्यात प्रवास करु इच्छिणाऱ्या प्रवाशांना तिकिट दिले जात नाही. महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या अथवा परराज्यातून महाराष्ट्रात येणार्‍यांनाच तिकीट दिले जात आहे. दुसरीकडे चौथ्या लॉकडाऊनची मुदत आता सात दिवसांवर आली असतानाही अद्याप जिल्हाबंदी उठवायची अथवा शिथिल करण्यावर काहीच निर्णय झालेला नाही. दरम्यान, जिल्हाबंदीबाबत वरिष्ठ स्तरावरुन काहीच नव्या सूचना आलेल्या नाहीत, त्यावर चर्चाही झाली नसल्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com