मृत्यूदर वाढलेल्या दहा जिल्ह्यांमध्ये सोलापूर ! दोन दिवसांत वाढले 91 हजार रुग्ण तर 451 जणांचा मृत्यू

Corona Spread
Corona Spread

सोलापूर : राज्यात मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये रुग्णवाढ आणि रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदरही वाढू लागला आहे. दररोज सरासरी 45 हजार रुग्ण वाढत असून दोनच दिवसांत 451 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार मृत्यूदर वाढत असलेल्या टॉप टेन जिल्ह्यांमध्ये सोलापूर सातव्या क्रमांकावर आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत हॉस्पिटलमधील बेड, व्हेंटिलेटर व ऑक्‍सिजन बेडची संख्या अपुरीच आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एका सर्व्हेनुसार राज्यातील 46 टक्‍केच लोक मास्क घालतात तर उर्वरित लोक विनामास्क रस्त्यांवर फिरत असल्याचे समोर आले आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आणि कोरोनाविषयीची कमी झालेली भीती, यामुळे बेशिस्तपणा वाढल्याचे चित्र आहे. रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूदर वाढत असल्याची चिंता प्रशासनाला लागली आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे, पहिल्या लाटेत कोरोनापासून दूर असलेली चिमुकलीही कोरोना बाधित होऊ लागली आहेत. लॉकडाउन करणे हा शेवटचा पर्याय नसल्याने विविध जिल्ह्यांनी कडक निर्बंध घालून कोरोना आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला आवरणे आता कठीण होऊ लागले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुख्यमंत्री लॉकडाउन करायचा की निर्बंध आणखी कडक करायचे, आणि लॉकडाउन केला तरी किती दिवसांचा करायचा, यासंदर्भात सोमवारी निर्णय जाहीर करणार आहेत. 

दहा जिल्ह्यांतच एका महिन्यात एकवीसशे मृत्यू 
राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नगर, नागपूर, नांदेड, सोलापूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 1 मार्च ते 2 एप्रिल या काळात अडीच लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे, याच दहा जिल्ह्यांमधील दोन हजार 115 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात नागपूरमध्ये सर्वाधिक 481, ठाण्यात 274, मुंबईत 248, पुण्यात 310, अमरावतीत 172, नाशिकमध्ये 196, सोलापुरात 137, नांदेडमध्ये 131, नगरमध्ये 89 तर यवतमाळमध्ये 77 रुग्णांचा समावेश आहे. सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरू असल्याने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ये-जा करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. विशेषत: एकाच कुटुंबातील कोरोना बाधितांसह मृतांचीही संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ठळक बाबी... 

  • राज्यात दोन दिवसांत (एप्रिलमध्ये) 91 हजार 10 रुग्ण; 451 जणांचा झाला मृत्यू 
  • मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, अमरावती, सोलापूर, नांदेड, नगर, यवतमाळ, नागपूरमध्ये वाढला मृत्यूदर 
  • सोलापूर शहर-जिल्ह्यात दोन दिवसांत साडेपंधराशे रुग्ण वाढले; दोन दिवसांत 26 जण ठरले कोरोनाचे बळी 
  • लॉकडाउनचा अंतिम निर्णय सोमवारी; दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी होईल 14 दिवसांचा लॉकडाउन 
  • राज्यातील शाळा राहणार बंदच; दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थी-पालकांमध्ये पुन्हा संभ्रम 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com