पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवून स्वतःची काळजी स्वतः घेणे हाच ऐकमेव उपाय आहे. लॉकडाउन हा त्यावरचा पर्याय होऊ शकत नाही, असे मत आमदार भारत भालके यांनी आज येथे व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज पंढरपुरात कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आले होते. बैठकीनंतर आमदार भालके यांनी पत्रकारांशी बोलताना पंढरपूर शहरातील वाढत्या कोरोनाविषयी चिंता व्यक्त केली. आमदार भालके म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. ही चिंतेची बाब आहे. लोकांनी आता सामाजिक अंतर ठेवणे, मास्क आणि सॅनिटायझरचा नियमीत वापर करणे गरजेचे बनले आहे. कोरोनाचा संसर्ग कधी संपले हे आताच सांगता येणार नाही. त्यामुळे आता सर्वांनाच कोरोनासोबत जगावे लागणार आहे.
लॉकडाउनमुळे काही प्रमाणात कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होते. परंतु ती वेळ आता निघून गेली आहे. संसर्ग झपाट्याने वाढत आहे. प्रत्येकाने स्वतःला वाचवण्यासाठी गर्दीपासून आणि सामुदायिक कार्यक्रमापासून दूर ठेवणे आवश्यक आहे. तसे केले तरच कोरोनापासून बचाव करता येईल. अन्यथा एक दिवस प्रत्येकाला त्याची झळ बसणार आहे. लॉकडाउन हा त्यावरचा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. उलट सततच्या लॉकडाउनमुळे लोकांचे हाल होतील. त्यातून त्यांचे जगणे मुश्कील होईल, अशी भिती देखील आमदार श्री. भालके यांनी व्यक्त केली.
संपादन : वैभव गाढवे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.