पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे होणाऱ्या चैत्री यात्रेच्या सोहळ्यासाठी कोणीही येऊ नये, असे आवाहन प्रमुख महाराज मंडळींनी केले आहे. प्रशासनाने देखील यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊ नये या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना संसर्ग होऊ नये यासाठी 17 मार्चपासून श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मंदिरातील नित्योपचार मात्र नेहमीप्रमाणे सुरू आहेत. दरम्यान 4 एप्रिलला चैत्री एकादशी आहे. चैत्री यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. यात्रेच्या निमित्ताने ठिकाणाहून पायी दिंड्या देखील पंढरपूरला येत असतात. एकादशीच्या आधी चार दिवसापासूनच पंढरपुरात भाविकांची गर्दी होत असते.
यात्रेसाठी पंढरपुरात भाविकांनी गर्दी केली तर कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. हे लक्षात घेऊन वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा उर्फ देवव्रत वासकर महाराज, रामकृष्ण महाराज विर, संत तुकाराम महाराजांचे वंशज चैतन्य महाराज देहूकर, संत नामदेवांचे वंशज नामदास महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक दिग्गज महाराज मंडळींनी चैत्री यात्रे साठी पंढरपूरला येऊ नये असे आवाहन केले आहे. दरम्यान पंढरपूर येथील जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापाऱ्यांच्या खेरीज बाकी सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. प्रशासनाच्या आवाहनानुसार वाद वगळता कोणीही घराच्या बाहेर पडत नाही. त्यामुळे सुदैवाने पंढरपूरमध्ये अद्याप कोरोना ची लागण एकाही व्यक्तीला झालेली नाही. या पार्श्वभूमीवर चैत्री यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरला आले तर त्यांच्या माध्यमातून कोरोना चा संसर्ग होऊ शकतो. हे लक्षात घेऊन चैत्र यात्रेसाठी कोणीही पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.