
अकलूज (सोलापूर) : जनावरांची खरेदी - विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे संसार देशोधडीस गेले असून, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेला बाजार लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, अशी आर्त मागणी व्यापारी वर्ग व शेतकरी बांधव करीत आहेत.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जनावरांचा मोठा बाजार भरला जातो. दर सोमवारी भरणाऱ्या बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. मार्चमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आठवडे बाजार व जनावरांचे बाजार बंद करण्यात आले. अकलूज व परिसरात 200 पेक्षा अधिक जनावरांचे व्यापारी आहेत. यातील अनेक व्यापारी स्वतःची रोख रक्कम गुंतवणूक करून जनावरांची खरेदी करतात व जादा किंमत मिळताच विकतात. नेहमी जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसांत खरेदी केलेली जनावरे विकली जातात. त्यामुळे खरेदी केलेली जनावरे जास्त दिवस संभाळावी लागत नाहीत. परंतु, लॉकडाउनमुळे गेल्या सहा महिन्यांपूर्वी विकत घेतलेली जनावरे अजूनही विकता आली नाहीत. त्यांना चारापाणी करणे अवघड झाले आहे. शिवाय उलाढाल नसल्याने व्यापाऱ्यांना स्वतःचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे.
काही व्यापाऱ्यांनी उपजीविकेसाठी बांधकाम करणाऱ्यांच्या (सेंट्रिंग) हाताखाली तर काहींनी चालक म्हणून तर काहींनी चक्क मोलमजुरी करण्यास सुरवात केली आहे. या बंदमुळे मोठे व्यापारीही नेस्तनाबूत झाले असून, त्यांच्या हाताखालील कामगारांचीही अवस्था दयनीय झाली आहे. व्यापाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांकडूनही जनावरांचा बाजार सुरू करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागात अनेक छोट्या शेतकऱ्यांकडे गायी, म्हशी याबरोबरच शेळ्या, मेंढ्या, बोकडे व कोंबड्या असतात. अनेक शेतकऱ्यांच्या दृष्टीने यातील काही जनावरे ही बॅंकेत ठेवलेली मुदत ठेवच असते. जेव्हा केव्हा पैशाची अत्यंत गरज भासते तेव्हा बाजारात नेऊन विकली जातात. परंतु बाजार बंद असल्याने जनावरे विकता येईनात. त्यामुळे खत खरेदीसाठी, उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडणारी व सहज रोख पैशात रूपांतरित होणारी ही ठेव बिनकामाची ठरली आहे. तसेच काही शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी, दूधदुभत्यांसाठी जनावरे खरेदी करावयाची असतात. त्यांनाही अडचणी येत आहेत.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील म्हणाले, परवानगी दिल्यास कोरोनाबाबतची सर्व काळजी घेऊन बाजार सुरू करण्यास तयार असून, व्यापारी व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन बाजार सुरू केले जावेत.
व्यापारी बाळासाहेब भोळे म्हणाले, माझ्यावर माझ्या कुटुंबासह माझ्याकडे असणाऱ्या कामगारांची कुटुंबे अवलंबून आहेत. आज माझ्याच उदरनिर्वाहाचा प्रश्न असून कामगारांचे काय करायचे, हा यक्ष प्रश्न माझ्यापुढे उभा आहे. तरी शासनाने व्यापाऱ्यांचा अंत पाहू नये. बाजार सुरू करावेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.