बार्शी-सोलापूर मार्गावर झाडांची कत्तल ः नविन रोपे लावणे गरजेचे

vrukshtod.jpg
vrukshtod.jpg

सोलापूर : बार्शी-सोलापूर या मार्गाच्या तीन पदरीकरणाच्या कामात शेकडो पुरातन वृक्षांची कत्तल झाली आहे. रस्त्याच्याकडेला अनेक ठिकाणी दुतर्फा लावलेल्या कडुनिंब, चिंच, पिंपळ व वटवृक्ष आशा अनेक मोठ्या देशी झाडांच्या पुर्नलागवडीसाठी आवश्‍यक साधनसामग्री उपलब्ध नसल्याने ही वृक्षतोड करावी लागली आहे. या वृक्षतोडीसाठी परवानगी देताना संबधित कंपनी नवीन वृक्षलागवडीची अट घालण्यात आलेली असून संबधित कंपनीवर संगोपनाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. आता नव्या वृक्ष लागवडीत देशी वृक्षांची लागवड होणे आवश्‍यक आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील जैवविविधता धोक्‍यात असून जैवविविधता जपण्यासाठी पर्यावरणीय जनजागृती करण्याची गरज आहे. यापूर्वी शासनाच्या रोपवाटिकेत व वृक्ष लागवड कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात विदेशी वृक्षांची लागवड होत होती. यासाठी शासनाने परिपत्रक काढून 13 कोटी वृक्ष लागवडीत देशी वृक्षांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आता शासकीय रोपवाटिकेत देशी वृक्ष उपलब्ध करण्यात आले असून यापुढे देशी वृक्ष लागवड करण्याकडे शासनाचाही कल वाढला आहे. खासगी कंपन्या व व्यक्तिगत वृक्षारोपणातही देशी वृक्ष लागवड होणे आवश्‍यक आहे. विविध कारणास्तव करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणात वटवृक्ष, पिंपळ, कडूनिंब, आपटा, जांभूळ, बोर, पिंपरन या देशी वृक्षांचा समावेश असणे गरजेचे आहे. देशी वृक्षंशिवाय इतर वृक्ष येथील वृक्षसंपदा धोक्‍यात आणू शकतात. या विदेशी वृक्षांमध्ये अकेशिया याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अशा वृक्षांमुळे येथील पक्षी जीवनही उद्‌ध्वस्त होण्याची शक्‍यता आहे. 

सोलापूर- बार्शी या नव्याने होणाऱ्या तीनपदरी मार्गासह जिल्ह्यात नव्याने झालेल्या विविध महामार्गांच्या बाजूला वृक्षलागवड करण्याची मोठी संधी सामाजिक वनीकरण विभागाला आहे. या लागवडीमध्ये देशी वृक्षांचा समावेश असणे गरजेचे आहे. सोलापूर-बार्शी या मार्गाचे तीनपदरीकरण मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या मार्गावरील जुनाट वृक्षांची पुर्नलागवड करण्याची आवश्‍यकता होती. मात्र, उपलब्ध यंत्रसामुग्री अभावी ही वृक्षतोड अटळ झाली असून यात मोठ्या प्रमाणात देशी झाडांचा बळी गेला आहे. संबंधित कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा वनखाते यांना आता अशी झाडे पुन्हा उभारण्यासाठी अनेक दिवस कष्ट घ्यावे लागतील, तरीही हे नुकसान भरून येणार नाही. या मार्गावर नव्याने वृक्षलागवड करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर असून त्या कंपनीकडून योग्य अशी अंमलबजावणी होणे, आवश्‍यक आहे. 

स्थानिक प्रजातीची रोपे उपलब्ध 
शासकीय रोपवाटिकेत सध्या देशी वृक्षांची रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शासनाकडून करण्यात येणाऱ्या वृक्षरोपणातही आमचा भर देशी वृक्षांवरच असतो. गुलमोहर वगळता सर्व विदेशी वृक्षांची लागवड आता बंद झाली आहे. पूर्वी लागवड झालेले अंदाजे पाच टक्के झाडे सोडली तर स्थानिक प्रजातींना महत्त्व दिले जात आहे. देशी वृक्ष हे सावली देणारे वृक्ष आहेत. देशी वृक्षांनाच वन खाते महत्त्व देत आहे. 
-सुवर्णा माने, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण 

वृक्षलागवडीची जबाबदारी घ्यावी
बार्शी-सोलापूर रस्त्यावर नव्याने वृक्ष लागवड करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरणीप्रेमींचा दबाव असणे आवश्‍यक आहे. पक्षीजगत सुस्थितीत राहण्यासाठी देशी वृक्षांच्या लागवडीला प्राधान्य दिले पाहिजे. अक्कलकोट रस्त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्वच महामार्गाच्या बाजूला दुतर्फा देशी वृक्षलागवड होणे आवश्‍यक आहे. 
-शिवानंद हिरेमठ, ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com