सोलापूर : उजनी धरणाच्या कॅचमेंट परिसरात सरासरी 243 मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर दुसरीकडे दौंड मधून पाच हजार क्युसेक्स निसर्गाने पाणी उजनी धरणात येत आहे. त्यामुळे सुमारे सव्वादोन लाख क्युसेकचा विसर्ग भिमा नदीत सोडून देण्यात आला आहे. हे पाणी उद्या (गुरुवारी) दुपारी चारपर्यंत पंढरपुरात पोहचणार असून मोठा पूल पाण्याखाली जाणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धिरज साळे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. ते सध्या धरणावरच ठाण मांडून असून प्रत्येक घडामोडीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली जात असल्याचेही ते म्हणाले.
अधीक्षक अभियंता म्हणाले...
काल रात्रीपासून सोलापूर शहर जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. तर भीमा नदीच्या काठच्या अनेक गावांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. दुसरीकडे बार्शी, अकलूज, बारामती, हैदराबाद अशा ठिकाणी जाणाऱ्या सर्व एसटी गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. पुढील चोवीस तासात पाऊस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा पाण्याचा प्रवाह येत असल्याने धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढू लागली आहे. सुरक्षितता म्हणून धरणातील मोठ्या प्रमाणावर पाणी भीमा नदीद्वारे खाली सोडण्यात येत आहे. त्यामुळे भिगवण येथे राष्ट्रीय महामार्गावर उजनी धरणाचे पाणी आल्याने सोलापुरातून पुण्याला जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. पुण्याहून सोलापूरकडे येणाऱ्या वाहनांच्या लोणी काळभोर येथे मोठ्या रांगा लागल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.