
सोलापूर : शहर-जिल्ह्यातील 45 वर्षांवरील अकरा लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी संपूर्ण जिल्ह्यात 162 केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. आज पंढरपूर तालुक्यात आठ केंद्रांपैकी एकाच पुळूज केंद्रावर लसीकरण सुरु होते. आज लसीचा साठा संपणार असून केवळ दोन हजार डोसच शिल्लक आहेत. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) सकाळच्या सत्रानंतर सर्वच लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागणार आहेत.
सहा लाख डोसची मागणी
लसीकरणासाठी लोक पुढे येत असल्याने जिल्ह्यात केंद्रे वाढविण्याचे नियोजन असून त्यासाठी सहा लाख डोस द्यावेत, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु, पूर्वीचा शिल्लक साठा संपल्याशिवाय लस मिळत नाही. काही ठिकाणी सर्व्हरचा अडथळा असल्याने त्यांनी वापरलेल्या लसीची नोंद होण्यास विलंब लागतो. त्यामुळे त्याठिकाणचे लसीकरण कधीकधी थांबावे लागत आहे.
- डॉ. अनिरुध्द पिंपळे, जिल्हा समन्वयक, लसीकरण, सोलापूर
जिल्ह्यासाठी आतापर्यंत अवघे सव्वादोन लाख डोस मिळाले. दिलेल्या लसीचा साठा संपल्यानंतरच पुन्हा लस मिळेल, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे वापरलेल्या लसीचा साठा त्यात नोंदला जात नसल्याने नियोजनातील 37 केंद्रे बंद ठेवावी लागली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यासाठी अवघे सव्वादोन लाख डोस उपलब्ध झाले असून उद्या (शुक्रवारी) लस संपणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लसीकरणासाठी रांगा लागत आहेत. आतापर्यंत ग्रामीण भागातील दोन लाख 37 हजार तर शहरातील 78 हजारांहून अधिकजणांनी लस टोचून घेतली आहे. त्यात 34 हजार 877 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असून 28 हजार शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तर 45 वर्षांवरील 36 हजार तर 60 वर्षांवरील 71 हजार जणांनी लस टोचली आहे. जिल्ह्यात 45 वर्षांवरील पाच लाख 59 हजार 582 व्यक्तींना तर 60 वर्षांवरील पावणेपाच लाख व्यक्तींना लस टोचणे अपेक्षित आहे. कोरोना वाढत असल्याने राज्य सरकारने निर्बंध कडक केले आहेत. दुसरीकडे वाहनचालक, ब्यूटी पार्लर, सलून, दुकानदारांनी लस टोचून घ्यावी, अन्यथा आरटीपीसीआर टेस्ट केल्याचे मागील 48 तासांतील प्रमाणपत्र जवळ बाळगावे, अशा सक्त सूचना केल्या आहेत. त्यापैकी दोन्हीही नसल्यास 10 एप्रिलपासून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दुसरीकडे मात्र, लसीचा मुबलक साठा नसल्याने "इकडे आड, तिकडे विहीर' अशी त्यांची आवस्था झाली आहे.
दुसरा डोस घेण्यासाठी विलंब
शहरातील व ग्रामीण भागातील तीन लाख 17 हजार जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. किमान 28 दिवसांनंतर त्यांनी दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे. पहिला डोस घेऊन तेवढा कालावधी पूर्ण केलेल्यांची संख्या दीड लाखांहून अधिक आहे. मात्र, लस उपलब्ध होत नसल्याने आतापर्यंत 29 हजारजणांनाच दुसरा डोस देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लसीची मागणी वाढत असल्याने मागणीप्रमाणे लस मिळत नसल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगू लागले आहेत. शहरातील काही केंद्रे लसीअभावी बंद पडल्याचेही चित्र पहायला मिळाले. शहरातील काही केंद्रांवर काही प्रमाणात लस उपलब्ध आहे, परंतु दुपारनंतर सर्वच लस संपेल, अशी स्थिती आहे. जिल्ह्यासाठी मिळालेल्या 19 हजार 500 डोसपैकी आज एका दिवसात 11 हजार 366 जणांनी लस टोचली. त्यामुळे लस मिळाल्यावरच लसीकरण पुन्हा सुरु केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.