वाशी मार्केट कनेक्‍शन भक्कम नसल्याने शेतीमाल मातीमोल : काय आहे समीकरण? वाचा 

Washi Market
Washi Market

सोलापूर : जिल्हाभरातील शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी हवे असलेले वाशी (मुंबई) मार्केटचे कनेक्‍शन अद्याप सुरळीत न झाल्याने त्यांच्या मालाला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतीच्या अर्थकारणाला लाखो रुपयांचा फटका बसू लागला आहे. वाशी मार्केटमधून आवक होणाऱ्या फळे व इतर मालाची आवक स्थानिक बाजारात होत नसल्याने स्थानिक व्यापारी देखील अडचणीत सापडले आहेत. 

वाशी मार्केटशी थेट संबंध ठेवून शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. अनेक प्रकारची फळे प्रामुख्याने शेतकरी विक्रीसाठी वाशीला नेत असतात. पपई, खरबूज, कलिंगड, केळी यांसारखी अनेक फळे थेट वाशीला नेली जातात. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून हा माल मध्यस्थांशिवाय थेट वाशीला नेला जातो. मात्र, लॉकडाउनमध्ये शेतीमाल वाहतुकीला परवानगी असली तरी वाशीमध्ये माल पोचवणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकरी नाइलाजाने स्थानिक बाजारात माल विकतात. त्याला पुरेसा भाव मिळत नाही. दोडका, गवार, भेंडी व सिमला मिरची या भाज्यांचा ऐंशी टक्के माल वाशी व इतर मोठ्या मार्केटला जातो. पण शेतकऱ्यांचा माल स्थानिक भागात विकावा लागत आहे.

ज्या भाज्यांना 40 रुपये प्रती किलो दर मिळतात त्या स्थानिक ठिकाणी केवळ वीस रुपयांना विकण्याची वेळ आली आहे. केवळ मार्केट नसल्याने हे दर अर्ध्यावर आले आहेत. त्यामध्ये पुन्हा वाहतूक खर्च शेतकऱ्यांना द्यावा लागतो. वाशी मार्केट सुरळीत होणे ही शेतकऱ्यांची निकडीची गरज होऊन बसली आहे. शासनाने शेतमाल वाहतुकीला परवानगी दिली तरी वाशीसारखे आंतरराज्य स्तरावर उलाढाल करणारे मार्केट सुरळीत करण्याची गरज मोठी आहे. 

वाशी मार्केटचा फटका जसा शेतकऱ्यांना बसला आहे, तसा तो स्थानिक फळ व्यापाऱ्यांना देखील बसला आहे. वाशी मार्केटमधून येणारी आयात फळे मिळेनाशी झाली आहेत. या वर्षीचा आयात सफरचंदाचा हंगाम संपत आला तरी अजूनही पुरेसा माल बाजारात नाही. सुरण, मोठा डांगर भोपळा, आर्वी यांसारख्या भाज्या वाशी मार्केटमधून येत असतात. पण आता त्याही मिळत नाहीत. व्यापारी देखील यामुळे अडचणीत सापडले आहेत. शेतमाल वाहतुकीस परवानगी देण्यासोबत राज्याच्या शेतीकारणावर परिणाम करणारे वाशीसारख्या मोठ्या बाजारपेठांचे व्यवहार सुरळीत व पूर्ण क्षमतेने चालणे आवश्‍यक आहे. त्याशिवाय शेतीमालाला रास्त भाव मिळणे अशक्‍य होणार आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे त्याशिवाय शक्‍य होणार नाही, असे शेतकरी व व्यापाऱ्यांचे देखील म्हणणे आहे. 

याबाबत प्रगतीशील शेतकरी प्रशांत भोसले म्हणाले, आमच्या भागातील शेतकऱ्यांनी भाज्या वाशी मार्केटमध्ये 40 रुपयांपेक्षा कमी विकल्या नाहीत. आज वाशी मार्केटची उलाढाल भक्कमपणे सुरू नसल्याने स्थानिक बाजारात मातीमोल भावाने माल विकावा लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com