
पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची झीज झाल्यामुळे दोन्ही मूर्तीवर वज्रलेप करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सध्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद असून रासायनिक लेप (वज्रलेप ) प्रक्रिया येत्या आषाढी एकादशीच्या महापूजेचे पूर्वी करण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न सुरू आहे.
दोन्ही मूर्तींची वेगाने झीज
सध्याची श्रीविठ्ठल मूर्ती बाराव्या शतकापूर्वीची आहे असे मानले जाते. वालुकाश्म प्रकारच्या पाषाणातील ही मूर्ती आहे. श्री रुक्मिणीमातेची मूर्ती नेपाळ मधील गंडकी नदीमध्ये सापडणाऱ्या गुळगुळीत पाषाणापासून बनवण्यात आलेली असल्याचे सांगितले जाते. श्रीविठ्ठलाची मूर्ती काहीशी खडबडीत तर श्री रुक्मिणी मातेची मूर्ती अतिशय रेखीव अशी आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीस पूर्वी दिवसातून अनेक वेळा महापूजेच्या निमित्ताने दही, दूध, मध, साखर वापरून अभिषेक केला जात असे. दिवसातून अनेक वेळा होणाऱ्या अशा महापूजेमुळे दोन्ही मूर्तींची वेगाने झीज होत होती. हे लक्षात घेऊन सुमारे आठ वर्षापूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांकडून केल्या जाणाऱ्या महापूजा पूर्ण बंद केल्या.
हेही वाचा : या जिल्ह्यात खरीप पिकाच्या पेरणीला प्रारंभ
2012 नंतर प्रक्रिया झालेली नव्हती
तेव्हापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीची फक्त पहाटेची नित्यपूजा मंदिर समितीच्या माध्यमातून केली जाते. तथापि लाखो भाविकांकडून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेतले जाते. त्यामुळे दर पाच वर्षांनी वज्रलेप करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना पुरातत्त्व विभागाने केलेल्या आहेत. यापूर्वी 1988, 2005 आणि 2012 साली पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वज्रलेप प्रक्रिया करण्यात आली होती. 2012 नंतर मात्र वज्रलेप प्रक्रिया झालेली नव्हती.
प्रक्रियाविषयी मागितली होती परवानगी
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने यासंदर्भातील ठराव करून औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना पंढरपूरला बोलावून त्यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची तसेच संपूर्ण मंदिराची पाहणी करून घेतली होती. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी वज्रलेप प्रक्रिया करण्याविषयी अहवाल दिल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मार्च 2020 मध्ये विधी व न्याय विभागाकडे रासायनिक लेप प्रक्रिया करून घेण्याविषयी परवानगी मागितली होती.
प्रक्रिया करण्यास परवानगी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 17 मार्चपासून भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शासनाकडून परवानगी मिळाली तर पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मंदिर भाविकांसाठी सुरू होण्याच्या आधीच वज्रलेप प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने मंदिर समितीने शासनाकडे पाठपुरावा चालू ठेवला होता. मंदिर समितीच्या मागणीची विधी व न्याय विभागाने दखल घेऊन प्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे.
एकादशीच्या आधी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न
औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन ते चार दिवसांत अतिशय चांगल्या पद्धतीने वज्रलेप प्रक्रिया पूर्ण केली होती. आता मंदिर भाविकांसाठी बंद असल्यामुळे प्रक्रिया करण्यास कोणतीही अडचण नाही. यासंदर्भात वज्रलेप प्रक्रियेसाठी शासनाची मंजुरी मिळाली आहे. आता तातडीने पुरातत्त्व विभागाची संपर्क साधून येत्या काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्या आधी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहणार आहे.
- सुनील जोशी,
कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.