सोलापूरकरांनो, उन्हाळ्यात चार-पाच दिवसांआड, रात्री 12.30 ते पहाटे 4.30 पर्यंत कधीही भरावे लागेल पाणी ! 

No_Water.
No_Water.

सोलापूर : शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था सुमार दर्जाची असल्याने नागरिकांना उन्हाळा असो वा पावसाळ्यातही तीन-चार दिवसांआडच पाणी मिळते. आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून नागरिकांना पाण्याची चिंता सतावू लागली आहे. दरम्यान, उन्हाळ्यात नागरिकांना चार-पाच दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागेल आणि त्यामुळे सर्वांनी पाणी जपून वापरावे, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आताच स्पष्ट केले आहे. 

स्मार्ट सिटीतून शहरातील एका भागाचा सर्वांगीण विकास होत असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र नागरिकांना पायाभूत सुविधादेखील पुरेशा मिळत नसल्याचे विदारक चित्र आहे. 102 पैकी सर्वाधिक नगरसेवक हद्दवाढ भागातील असतानाही नागरिकांना पाण्यासाठी, रस्त्यांसाठी संघर्ष करावा लागतोय, ही खंत आहे. सोलापूर- उजनी जलवाहिनी जुनी झाल्यानंतर आता आगामी दहा वर्षांची शहराची अंदाजित लोकसंख्या विचारात घेऊन समांतर जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, सभागृहाच्या माध्यमातून अनेकदा अनेकांनी शहराच्या पाणीपुरवठ्याबद्दल भविष्याचा प्लॅन सांगितला. परंतु, राजकीय संघर्षात फलनिष्पत्ती काहीच झाली नाही आणि आता त्याचा पश्‍चात्ताप करावा लागतोय. 

दरम्यान, समांतर जलवाहिनी झाल्यानंतरही पाण्याची गरज भागणार नाही, अशी शक्‍यता आताही वर्तविली जात आहे. मात्र, त्या विषयाकडे पॉलिटिकल स्टेटमेंट म्हणून पाहिले जात आहे, हेही दुर्दैवच. शहराची वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याची गरज, शहरातील पाणीपुरवठ्याची व्यवस्था यादृष्टीने ठोस कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे; जेणेकरून सोलापूरकरांच्या स्वप्नातील नियमित पाणी त्यांना नक्‍की मिळेल, असा अनेकांना विश्‍वास आहे. 

शहराची पाण्याची स्थिती 

  • अंदाजित लोकसंख्या : 12.50 लाख 
  • दररोजची पाण्याची गरज : 210 एमएलडी 
  • सध्या मिळणारे पाणी : 150 एमएलडी 
  • पाण्याची गळती : 40 एमएलडी 
  • उन्हाळ्यात वाढीव मागणी : 30 एमएलडी 
  • उन्हाळ्यातील गळती : 60 एमएलडी 

पाणीपुरवठा सुरळीत होईल याची शाश्‍वती नाही 
उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते, परंतु पंपहाउसमधून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा होत नाही. शहराची गरज दररोज 200 एमएलडीहून अधिक असतानाही सध्या 150 एमएलडीच पाणी मिळते. उन्हाळ्यात गळती वाढते आणि त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत राहील, हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. 
- सिद्धेश्‍वर उस्तुरगे, 
अभियंता, सार्वजनिक आरोग्य व पाणीपुरवठा, महापालिका, सोलापूर 

पहाटे साडेचार ते रात्री साडेबारापर्यंत पाण्याची वेळ 
शहरातील पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन कमी क्षमतेची असून आता काही भागातील पाइपलाइनचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. सोलापूर- उजनी पाइपलाइन असो वा सध्याचे पंपहाउसही जुने झाले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातील कडक ऊन आणि पंपहाउसमधील वारंवार होणारा तांत्रिक बिघाड, यामुळे नागरिकांना पहाटे साडेचार ते रात्री साडेबारा या वेळेत कधीही पाणी भरावे लागणार आहे. काही भागाला तांत्रिक कारणास्तव पाणी न मिळाल्यास त्यांना पहाटे साडेतीन, चार वाजता अथवा रात्री साडेबारा वाजताही पाणी भरावे लागेल, असेही काही अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

आमदारांकडून काहीच प्रयत्न दिसत नाहीत 
शहराचा पाणीपुरवठा तीन-चार दिवसांवरून दोन-दिवसांआड करण्याच्या दृष्टीने महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार विजयकुमार देशमुख यांनी बैठक घेतली. आमदार सुभाष देशमुख यांनीही अनेकदा त्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करून त्यांना विस्कळित पाणीपुरवठ्याची ठिकाणे व स्थितीचा सर्व्हे करण्यास सांगण्यात आले. मात्र, धक्‍कादायक बाब म्हणजे या समितीची एकही बैठक झाली नाही आणि त्यांनी सर्व्हेसुद्धा केला नाही. आता अधिकारी म्हणतात, तास कमी करून पाणीपुरवठा सुधारण्याचा प्रयत्न म्हणजे "दात टोकरून पोट भरणे' असाच प्रकार होय. राज्यातील सत्ता गेल्यानंतर दोन माजी मंत्री प्रवाहाबाहेर गेले आहेत. तर दुसरीकडे विरोधकांवर टीका करणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे या शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने निधी मिळावा, म्हणून तितकासा रेटा लावताना दिसत नाहीत, अशीही चर्चा आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com