सोलापूर : नैसर्गिक आपत्ती, गडगडणारे बाजारभाव, कर्जमाफीचा पत्ता नाही, साखर कारखान्यांकडून एफआरपीचे पैसे नाहीत, त्यातच हमीभावाने विकलेल्या हरभरा व तुरीचे पैसेही वेळेवर नाहीत. या कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन महिन्यांहून अधिक कालावधी होऊनही तब्बल दोन लाख शेतकऱ्यांना तूर व हरभऱ्याचे एक हजार 147 कोटी रुपये मिळालेले नाहीत.
सध्या पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या मशागतीला जोर आला आहे. परंतु, मशागत, खते व बी-बियाणे यासह अन्य कामांसाठी शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळेनात. तुरीचे पैसे बहुतांश शेतकऱ्यांना मिळाले. परंतु, 1 मार्च ते 13 जून या कालावधीत हमीभावाने खरेदी केलेल्या हरभऱ्याची रक्कम सुमारे एक लाख शेतकऱ्यांना मिळालीच नाही. तसेच सुमारे पावणेदोन लाख शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा अद्यापही हमीभावाने खरेदी झालेला नाही. ज्या-ज्या शेतकऱ्याची तूर हमीभावाने खरेदी झालेली नाही. त्यांना राज्य शासनाकडून प्रतिक्विंटल हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. परंतु, अद्यापही बहुतांशी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. अशा परिस्थितीत खासगी सावकाराचे दार ठोठावण्याशिवाय दुसरा पर्यायच नसल्याची चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. याबाबतीत सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याचे मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले.
आकडे बोलतात...
तूर नोंदणी शेतकरी
4,58,306
हमीभावाने तूर खरेदी
25,87,916 क्विंटल
वाटप केलेली रक्कम
967.75 कोटी
न मिळालेली रक्कम
430 कोटी
शिल्लक शेतकरी
1,81,447
हरभरा नोंदणी शेतकरी
3,02,728
हमीभावाने हरभरा खरेदी
19,02,000 क्विंटल
न मिळालेली रक्कम
717.88 कोटी
शिल्लक शेतकरी
1,42,028
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.