
सांगली : अनेक अटींमुळे शेतीकर्जमाफी होत नसल्याच्या तक्रारी नेहमीच्याच मात्र ज्यांचा नावावर सात बारा उताराच निघत नाही अशा नऊ जणांना सुमारे 16 लाखांची कर्जमाफी झाली आहे. वाळवे तालुक्यातील गोटखिंडी गावातील हा प्रकार याप्रकरणी आज मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दोन सोसायट्यांच्या सचिवांसह पदाधिकाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनीही चौकशीचे आदेश दिले असून गेले दोन दिवस सोसायट्याची दप्तर तपासणी सुरु झाली आहे.
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी अनियमित कर्जवाटपातून सुमारे वीस लाखांची नातलग-पैपाहुण्यांना कर्जमाफी करवून घेतल्याचा आरोपही केला आहे. श्री सावंत यांनी पाठपुरावा करणारे ग्रामस्थ सुरज शेवाळे, सुनील थोरात, विवेक थोरात, राहुल थोरात, प्रदिप थोरात, वैभव थोरात यांनी पत्रकारांसमोर याबाबतची सर्व कागदपत्रे सादर केली. नावावर शेतीच नाही तरीही कर्जमाफी, ज्यांना कर्जमाफी झाली त्यांनाच त्याचा पत्ता नाही, पाच-दहा गुंठे नावावर शेती असूनही लाखांची कर्जे असे गैरप्रकाराचे स्वरुप असून ग्रामस्थांनी गोटखिंडी विकास सोसायटीचे सचिव अनिल पाटील आणि महादेव विकास सोसायटीचे सचिव दीपक थोरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी ः कर्जमाफी झालेल्या गावातील 16 जणांचे सात-बारा उतारे तलाठ्यांकडे मागितले असता त्यांनी त्यापैकी ज्योती थोरात, राणी देसाई, अर्चना थोरात, सुवर्णा थोरात, कांचन गावडे, रुपाली जाधव, रामेजब्बी पठाण, विजय ढवळे, किसन जाधव यांच्या नावावर गावात सातबारा उताराच निघत नसल्याचे लेखी उत्तर दिले. तथापि या सर्वांच्या नावे कर्जमाफीची 94 हजार ते 1 लाख 97 हजारांच्या रकमा जमा आहेत. हनिफ पठाण यांच्या नावे 40 गुठे जमीन आहे त्यांना बॅंक खात्यावर 1 लाख 94 हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याचा मेसेज आल्यानंतरच कर्जमाफी झाल्याचे कळले. प्रत्यक्षात त्यांनी कर्जच काढलेले नव्हते की कर्जमाफीसाठी पाठपुरावाही केला नव्हता. त्यांच्या पत्नी रामेजब्बी यांच्या नावावर सात बारा नसतानाच 1 लाख 67 हजारांची कर्जमाफी झाली आहे.
श्री सावंत म्हणाले,"" नावावर जेमतेम 4-5 गुंठे जमीन असलेल्यापैकी अध्यक्ष, संचालक, सचिव यांना लाखा लाखांच्या कर्जमाफीच्या रकमा प्राप्त झाल्या आहेत. इतकी मोठी कर्जे दिलीच कशी? दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. याप्रकरणी राजकीय दबावाची शक्यता असून सहकार विभागाने निःपक्षपणे चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत.''
गोटखिंडीतील दोन्ही विकास सोसायट्यांमधील कर्ज प्रकरणांबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशी सुरु आहे. त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित असून चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल.
निळकंठ करे
जिल्हा सहकार उपनिबंधक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.