Betel leaf farming : पानमळे वाचविण्यासाठी धावपळ

शेतकरी हवालदिल : रोग अन्‌ दराचाही फटका
Agriculture department Disease hit Farmer Betel leaf farming nipani
Agriculture department Disease hit Farmer Betel leaf farming nipani sakal

निपाणी : सततच्या वातावरण बदलाने खाऊच्या पानावर (नागवेली) गंभीर परिणाम होत असल्याने परिसरातील उत्पादक हवालदिल झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी झालेली अवकाळीची अतिवृष्टी, त्यानंतरची थोडीफार थंडी, उष्ण व दमट हवामान आणि सध्या सुरू असलेल्या ढगाळ वातावरणाचा फटका पान मळ्यांना बसत आहे. चित्ता, कुजका, बुरशी यासारखे रोगही पडत आहेत. या अवस्थेत पानमळे वाचविताना धावपळ करणाऱ्या उत्पादकांची चिंता वाढली आहे. अलीकडे ऊस, सोयाबीन, फुलशेती, भाजीपाला उत्पादनाकडे शेतकरी वळल्याने परिसरातील पारंपरिक पानमळ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. तरीही गळतगा, खडकलाट, नवलीहाळ, चिंचणी, शिरगाव, तपकारवाडी, नेज, जैनापुर, धुळगणवाडी, शिरगाव, उमराणी, हत्तरवाट, नागराळ इत्यादी गावांच्या परिसरात जास्त पान उत्पादन होत होते. मात्र आता पानमळ्यांची संख्या घटली आहे.

हे पानमळे टिकवून निसर्गाशी टक्कर देत उत्पादन वाढविण्यासाठी उत्पादक पाराकाष्ठा करत आहेत. येथील पानांना खास मागणी असल्याने जिल्ह्यासह राज्यातील मोठ्या शहरांबरोबरच महाराष्ट्र, गोव्यातील प्रमुख शहरात ती नियमित पाठविली जातात. यंदा झालेल्या अवेळीच्या अतिवृष्टीने कुजकारोग, चित्तारोग, बुरशी यामुळे पानवेलीवर परिणाम झाला. हा परिणाम तत्काळ न दिसता दोन महिन्यांनंतर तो दिसू लागला आहे. त्यातच आता ढगाळ वातावरण, हलका पाऊस व खराब हवामान निर्माण झाले आहे. पाने पिवळी पडत आहेत. आखूड होत आहेत. ही पिवळी पाने खुडून टाकून मळे निरोगी ठेवण्यासाठी उत्पादकांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रतवारीनुसार सध्या दोनशे ते एक हजार रुपये या दराने पानाची करंडी विकावी लागत आहे. खरेतर लावणीनंतर एक ते दीड वर्षांनी पानांचे उत्पादन खऱ्या अर्थाने सुरू होते. ते किमान दहा वर्षांपर्यंत मिळते. मात्र, हे पानमळे टिकविण्यासाठी खत, पाणी, कीटकनाशकांचे व्यवस्थापन, वाढती मजुरी पाहता मिळणारा भाव परवडणारा नाही. अशातच सततच्या बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसत असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ते कसे टाळायचे हा उत्पादकासमोरचा प्रश्न चिंता वाढवणारा आहे. शासकीय यंत्रणेने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

मळे निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न

उत्पादकांशी बोलताना काहींनी सांगितले की पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला. सध्याचे वातावरणही खराब आहे. त्यात अनेक पानमळ्यांना हानी पोचली. चित्ता रोगाने पिकून पिवळी पडणारी पाने खुडून मळे निरोगी ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई-कोलकत्त्याला पान

एकेकाळी पुणे, मुंबई, कलकत्ता पर्यंत येथील पान मळ्यातील दर्जेदार खाऊची पाने नियमितपणे पोहोचत होती; परंतु अलीकडे ऊस, सोयाबीन, भाजीपाला, फुलशेतीमुळे पानमळ्यांची संख्या नगण्य झाली आहे. निपाणी, चिक्कोडी या दोन्ही तालुक्यात पंधरा गावांच्या क्षेत्रात मोजकेच शेतकरी उत्पादन घेऊन पानांचा दर्जा टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत. आजही तळ कोकण, गोवा, पुणे, मुंबई, बंगळूर इत्यादी शहरात नियमितपणे पानांचे डाग पाठविले जातात. फक्त निपाणी शहरात साधारण दोनशेहून अधिक लहान-मोठे पानांचे ठेले या परिसरातील उत्पादित पानावर चालतात. या पान विक्रीवर चांगला उद्योग व्यवसाय सुरू आहे.

पूर्वीच्या तुलनेत परिसरातील पानमळ्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. तरीही पारंपरिक उत्पादन पद्धतीनुसार शेतकऱ्यांनी काही पानमळे अजूनही टिकविले आहेत. परंतु सध्याचे बदलते खराब हवामान तापदायक ठरत आहे. मजुरी, कीटकनाशके, खतांचे दर वाढले आहेत. परिणामी उत्पादन खर्चाच्या तुलनेत पानांना दर मिळत नाही.

-अशोक यादव,पान उत्पादक, खडकलाट.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com