Al Nino: ‘अल् निनो’च्या प्रभावात ४०० गावे; ९१० वाड्यांना जाणवणार पाणीटंचाई

यंदाच्या मॉन्सूनवर ‘अल् निनो’चा प्रभाव पडण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने जूननंतरही टंचाई जाणवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
El Nino
El NinoSakal
Summary

यंदाच्या मॉन्सूनवर ‘अल् निनो’चा प्रभाव पडण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने जूननंतरही टंचाई जाणवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सांगली - यंदाच्या मॉन्सूनवर ‘अल् निनो’चा प्रभाव पडण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने जूननंतरही टंचाई जाणवण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने टंचाई विशेष कृती आराखडा तयार केला असून, त्यानुसार जुलै-ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील ४०० गावे व ९१० वाड्यांना टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

दक्षिण प्रशांत महासागरातील ‘अल् निनो’ या सामुद्री प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मॉन्सूनच्या पावसावर परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जूननंतरही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी टंचाई भासू शकणारी गावे व वाड्यांतील टंचाई निवारणार्थ विशेष कृती आराखडा तयार केला आहे.

टँकरने पाणी पुरवठा, विहीर अधिग्रहण

टंचाई आराखड्यानुसार ४०० गावे व ९१० वाड्यांना पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यापैकी १८१ गावे आणि ५१० वाड्यांना १९८ टँकरद्वारे; तर २१९ गावे व ४०० वाड्यांना पाणी पुरवठ्यासाठी २७३ विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सात कोटी ४८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

‘उपसा’साठी दीड कोटी

जुलै, ऑगस्टनंतर टंचाई तीव्र झाल्यास उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून तलाव, विहिरी भरून घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी या योजनांच्या वीज बिलासाठी दीड कोटींची तरतूद या प्रस्तावित आराखड्यात करण्यात आली आहे. असा ८ कोटी ९८ लाखांचा टंचाई निवारण आराखडा तयार आहे.

जूनअखेर १६७ गावांत टंचाई

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीतील आराखड्यानुसार १६७ गावे आणि ८३९ वाड्या-वस्त्यांना टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी चार कोटींचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. जूनअखेर संभाव्य पाणीटंचाई भासणारी गावे व वस्त्यांना ७६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. १०६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे.

तलावांत ६० टक्के साठा

जिल्ह्यातील तलावांमध्ये सध्या ६० टक्के पाणीसाठा असल्याचा अंदाज आहे. जूनअखेर हा पाणीसाठा टंचाई भासणाऱ्या काही गावांसाठी उपयोगात येऊ शकतो. जिल्ह्यातील सिंचन योजनांच्या कार्यक्षेत्रातील हे तलाव आहेत. पाणी टंचाई तीव्र होऊ शकणाऱ्या १०५ गावांना या सिंचन योजनातून पाणी उपसा करून पुरवठा करावा लागू शकतो.

यंदाच्या पावसाळ्यावर ‘अल् निनो’चा प्रभाव पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या अनुषंगाने टंचाई आराखडा केला आहे. संभाव्य पाणीटंचाईची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने पाणीटंचाईला तोंड देण्याची तयारी केली आहे. गावांना पाणी टंचाई होऊ नये, यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे.

- जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com