सर्वच मतदारसंघांत "काटे की टक्कर !

सर्वच मतदारसंघांत "काटे की टक्कर !

सातारा : दोन्ही राजांचा पक्षप्रवेश करून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्‌ध्वस्त केल्याचे चित्र भारतीय जनता पक्षाच्या धुरिणांकडून उभे केले गेले; परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कालच्या दौऱ्याने मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणण्याचे काम झाले. काल कार्यकर्त्यांनी दाखवलेला उत्साह पाहता राष्ट्रवादीही या निवडणुकीत ताकदीने उतरणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत काटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

संपूर्ण देशात भाजपचा झंझावात असताना 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा साताऱ्याचा गड ढासळवण्याचे भाजपचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यामध्ये पक्ष बांधणीसाठी भाजपने अतोनात प्रयत्न केले. त्यातून जिल्ह्यामध्ये नवीन नेतृत्वही पुढे येत होते. या बांधणीचा परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचे मताधिक्‍य कमी करण्यात भाजपला यश आले. पक्षाची पाळेमुळे जिल्ह्यात हळूहळू रुजत चालल्याचेच ते द्योतक होते; परंतु भाजपच्या धुरिणांना ही संथ चाल कदाचीत रुचली नाही.

त्यामुळे मेगा भरतीमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील राजेंना आपलेसे केले. आमदारकीचा राजीनामा देऊन शिवेंद्रसिंहराजे भाजपवासी झाले. एवढ्यावरही भाजपवाल्यांचे समाधान झाले नाही. राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या खासदार उदयनराजेंसाठीही त्यांनी गळ टाकला. राजेंनीही अवघ्या तीन महिन्यांत खासदारकीचा राजीनामा दिला. माशी इथेच शिंकली.

जिल्ह्यातील जनतेला हे रुचले नाही, अशाच प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागल्या. समाज माध्यमांबरोबरच लोकांच्या चर्चेच्या अग्रस्थानी तेव्हापासून हाच मुद्दा आहे. असं व्हायला नको होतं, हेच अनेकांच्या तोंडून येताना दिसते आहे. त्यामुळे युतीसाठी काहीसे आशादायक असलेले जिल्ह्यातील चित्र बदलायला सुरवात झाली होती. लोकांच्या याच नाराजीचे प्रकटीकरण कालच्या शरद पवारांच्या दौऱ्यात पुरेपूर पाहायला मिळाले. शरद पवारांचे व राष्ट्रवादीचे अनेक कार्यक्रम आजवर झाले; परंतु कार्यकर्त्यांमध्ये काल प्रचंड जोश दिसला.

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापासून आलेला "साहेब, मी तुमच्या सोबत आहे,' हे सांगण्याचा प्रयत्न करत होता. शरद पवारांच्या प्रत्येक आव्हानाला कार्यकर्त्यांचा मनापासून व भरभरून प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे शरद पवारांपासून सर्व आमदारांची देहबोली काल नक्कीच बदललेली जाणवत होती. नेत्यांपासून कार्यकर्त्यांना कालचा दौरा एक आत्मविश्‍वास देऊन गेल्याचे कार्यकर्त्यांच्या सभेनंतरच्या चर्चेतून जाणवत होते. त्यामुळे बालेकिल्ला ढासळवण्याचे मनसुबे आखलेल्या भाजपसाठी कालच्या दौऱ्यातून राष्ट्रवादी जणांना मिळालेले चैतन्य अडचणीचे ठरू शकते, असे राजकीय जाणकारांच्या तोंडी येऊ लागले आहे.

पक्षप्रवेशांची खेळी किमान जिल्ह्यात, तरी भाजपच्याच अंगलट येऊ शकते, युतीच्या सर्वच उमेदवारांवर याचा परिणाम होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही, असेही ते म्हणताहेत. या दौऱ्यामुळे होणारे डॅमेज कंट्रोल भाजप कसे करणार, हेही पाहावे लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com