अण्णा हजारे यांचे आजपासून मौन 

Anna Hazare's silence from today
Anna Hazare's silence from today

पारनेर : देशात महिलांवर अन्याय व अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, अत्याचारग्रस्त महिलांना लवकर न्याय मिळत नाही. तसेच, अत्याचारानंतर न्याय मिळेपर्यंत या महिलांना संरक्षणही मिळत नाही. अशा महिलांना जलद न्याय मिळावा, अशा गुन्ह्यांचा तपास महिला अधिकाऱ्यांमार्फतच व्हावा, दिल्लीतील निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना त्वरित शिक्षा व्हावी, यासाठी आत्मक्‍लेश म्हणून उद्यापासून (शुक्रवार) राळेगणसिद्धी येथे मौन धारण करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पत्रकाद्वारे जाहीर केले. 

हजारे यांनी याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की गेल्या काही दिवसांपासून देशात महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय-अत्याचार होत आहेत. अन्यायग्रस्त महिलांना न्यायही लवकर मिळत नाही. याउलट, न्याय मिळेपर्यंत अनेक अन्यायग्रस्त महिलांवर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हल्ले होत आहेत. त्यांना संरक्षणही दिले जात नाही, ही बाब मानवतेला कलंक आहे. 

अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळेच हैदराबाद येथील एन्काउंटरचे जनतेतून स्वागत झाले. अशा महिलांना पोलिस ठाण्यांतही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच, महिलांवरील अन्यायाच्या गुन्ह्यांचा तपासही महिला अधिकारी न करता पुरुषच करतात. वकीलही पुरुषच असतात, ही बाब खटकणारी आहे. यात दुरुस्ती होणे गरजेचे आहे. कारण, यामुळे महिलांना हकिगत सांगताना संकोच वाटतो. पुरुष अन्याय करतात व चौकशीही पुरुषच करतात, हे चुकीचे आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने पोलिस यंत्रणेत सुधारणा करण्याच्या सूचना 2012मध्ये केल्या होत्या. मात्र, त्याप्रमाणे बदल अद्याप झाले नाहीत. न्यायाधीशांची संख्या कमी असल्याने न्यायदानात विलंब होत आहे. त्यासाठी न्यायाधीशांची भरती करणे गरजेचे आहे. कारण, सामान्य माणसाचे जीवन न्यायदानाशी जोडलेले आहे. केवळ न्यायदानास उशीर झाल्याने उन्नाव येथील महिलेवर पुन्हा हल्ला झाला व तिला जीव गमवावा लागला. यासाठी जलद न्याय व अन्यायग्रस्त महिलेला संरक्षण गरजेचे आहे, असा आग्रह हजारे यांनी पत्रकात व्यक्त केला आहे. 

निर्भया प्रकरण 2013मध्ये घडले. मात्र, अद्यापही संबंधित गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली नाही, ही खेदाची बाब आहे. यासाठी अशा महिलांवरील अन्यायाची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल होण्यापासून निकाल लागेपर्यंतची सर्व प्रक्रिया वेगाने होणे गरजेचे आहे. याबाबत मी पंतप्रधान व राष्ट्रपतींना यापूर्वी पत्र पाठवून कळविले आहे. मी केवळ जनसेवक या नात्याने आत्मक्‍लेश म्हणून राळेगणसिद्धी येथे उद्यापासून मौन धारण करत आहे, असे अण्णांनी पत्रकात स्पष्ट केले आहे. 

...यासाठी अण्णांचा आत्मक्‍लेश 
- अत्याचारग्रस्त महिलांना लवकर न्याय मिळत नाही. 
- अत्याचारानंतर न्याय मिळेपर्यंत या महिलांना संरक्षणही मिळत नाही. 
- पुरुष अन्याय करतात व चौकशीही पुरुषच करतात, हे चुकीचे आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com