अयोध्येत रामाच्या मूर्तीला मिशी असावी...भिडे गुरूजींची मोठी मागणी....गोविंदगिरी महाराजांना केली विनंती

sambhaji bhide.jpg
sambhaji bhide.jpg

सांगली-  अयोध्येत श्री राम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा 5 ऑगस्ट रोजी होत असून हा दिवस राष्ट्रीय सोहळा म्हणून सर्वत्र साजरा केला जावा. सर्वत्र दिवे लावून शोभेची दारू उडवून आनंद प्रकट करावा. राम-सीतेची पूजा करावी असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. तसेच अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीरामाच्या मूर्तीला मिशी असावी अशी विनंती मंदिर उभारणीतील प्रमुख गोविंदगिरी महाराज यांच्याकडे केली असल्याचे श्री. भिडे यांनी सांगितले. 


ते म्हणाले, ""देशाची संस्कृती ही अतिप्राचीन आहे. महर्षी दयानंदाच्या मताप्रमाणे वेदाची निर्मिती फार वर्षांपूर्वीची आहे. प्रदीर्घ काळात देशात अनेक सुख-दु:खाचे प्रसंग आले. जगभरातील बाकी राष्ट्रे ही त्यांच्या देशासाठी कार्यरत आहेत. परंतू भारत हा एकमेव देश विश्‍वाच्या कल्याणाचा विचार करतो. याच देशातील प्रभू रामचंद्र या अलौकीक, असामान्य आणि अतुलनीय मंदिराचा विध्वंस मुस्लिम आक्रमक बाबराने केला. 1526 ला आक्रमण करून राममंदिर उध्वस्त करून मशिद उभारली गेली. त्यानंतर मंदिर उभारणीसाठी गेली पाचशे वर्षे लढा सुरू आहे. अखंड प्रयत्नानंतर 1992 मशिद पाडण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आता अयोध्येत मंदिर उभारले जात आहे. 5 ऑगस्ट रोजी साधूसंत, महंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिराचे भूमीपूजन होत आहे. हा देशाला स्फूर्ती व प्रेरणा देणारा प्रसंग आहे. दसरा-दिवाळीप्रमाणे हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे.'' 

ते पुढे म्हणाले, ""अयोध्येतील मंदिर उभारणीतील प्रमुख गोविंदगिरी महाराज यांच्याशी नुकतेच मंदिर उभारणीबाबत बोललो आहे. राम हे अतुलनीय व अनुकरणीय प्रेरणा देणारे पुरूष दैवत आहे. त्यामुळे रामाच्या मूर्तीला मिशी असावी अशी त्यांना विनंती केली आहे. आजपर्यंतचे राममंदिर किंवा प्रतिमेत मिशी दिसत नाही. आजपर्यंतच्या चित्रकार व मूर्तीकार, शिल्पकारांनी मूर्ती किंवा प्रतिमा निर्माण करताना चूक केली आहे असे वाटते. त्यामुळे ती दुरूस्त करावी असे गोविंदगिरी महाराजांना सांगितले. या शिवाय मूर्ती उभारली गेल्यास मंदिर होऊनसुद्धा मंदिर न झाल्यासारखे माझ्यासारख्या भक्ताला वाटेल. तसेच घुसखोर व आक्रमकाविरूद्ध लढलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन 5 ऑगस्टला आवश्‍य करावे असे सांगितले आहे. भूमिपूजनासाठी राज्यातील गडावरील माती व पाणी अयोध्येला पाठवले आहे.'' 

संकट असले तरी उत्सव करा- 
"कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर उत्सव कसा करायचा? या प्रश्‍नावर श्री. भिडे म्हणाले, ""कोरोना हे मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे. कुरूक्षेत्रावरील अर्जुनाच्या मन:स्थितीप्रमाणे हिंदू समाजाची अवस्था प्रथमपासून आहे. त्यामुळे कोरोनाची भिती काढून टाकावी. लॉकडाउन उठवण्याची गरज आहे. नि:शुल्क औषधे पुरवावीत. कोरोना असला तरी 5 ऑगस्टला राष्ट्रीय सण साजरा करावा. स्वातंत्र्यदिन देखील साजरा करावा. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगची गरज नाही.'' 

शरद पवारांनी अयोध्येत जावे- 
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंदिराच्या मुद्दयावरून केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता श्री. भिडे म्हणाले, ""दोघांचे विधान गोंधळलेल्या अर्जुनासारखे आहे. कोरोना आणि भूमीपूजन यांची सांगड घालणे योग्य नाही. पवारांनी यावर बोलणे योग्य नाही. पवार हे वंदनीय आहेत. त्यांनी निमंत्रण नसले तरी अयोध्येला जावे. राज्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी तेथे उपस्थित असणे आवश्‍यक आहे. तसेच उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या या संकटात राज्यात दौरा करून जनतेला धीर द्यावा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com