सांगली : जिल्ह्यात सहा महिने पुरेल इतका धान्यसाठा असल्याचे मंत्री सांगत असले तरी धान्यासह जीवनावश्यक वस्तूंची तसेच काही शेतीसाठीची खते-औषधांची कृत्रिम दरवाढ सुरु झाली आहे. सध्याच्या कोरोना साथीमुळे बाजारपेठ ठप्प असल्याचा फायदा उठवला जात आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत झाल्याने यापुढे कोणतीच टंचाई नसेल त्यामुळे कोणी साठेबाजी करून दरवाढ करीत असेल तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी आज "सकाळ' शी बोलताना दिला.
शहरी व ग्रामिण भागातील किराणा दुकाने 24 तास उघडी ठेवण्यास राज्यशासनाने परवानगी दिली आहे. हेतू हा की जीवनावश्यक वस्तूंची टंचाई नाही, असा संदेश जनतेत जावा. मात्र आजही शहरातील बहुतेक किराणा दुकाने सकाळ सत्रातच सुरु असतात. सायंकाळी दुकाने उघडी ठेवूनही उपयोग होत नाही. कारण सक्तीची संचारबंदी लागू असते. रोज सकाळ सत्रात दुकानांत खरेदीसाठी झुंबड उडालेली असते. ग्रामीण भागातील दुकानदारांकडून दरवाढ करण्यामागे वाहतूक बंदचे कारण सांगितले जाते. त्याचा आधार घेत व्यापाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तूंच्या दर चढे लावले जात असल्याच्या तक्रारी आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनाने 1100 वाहनांना आज तातडीने परवाने दिले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याचे कारण यापुढे व्यापाऱ्यांना देता येणार नाही. हे कारण पुढे करून व्यापाऱ्यांना दरवाढ करता येणार नाही.
सध्या शेतीच्या विविध कामांसह द्राक्ष हंगाम सुरु झाला आहे. शेतीच्या मशागतींसाठी ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल काही पंपावर दिले जाते, तर अनेक पंपावर टाळले जाते. गहू, शाळू, हरभऱ्यांची मळणी सुरु असली तरी कडब्याची वाहतुक पोलिसांनी रोखलेली आहे. या काळात पाऊस झाला तर वर्षभराची कोंडी होईल. द्राक्षाच्या एप्रिल खरड छाटण्यासाठीही खते आणि फवारणी साहित्य (हायड्रोजन सायनामाईड, डॉरमॅक्स) सध्या टंचाई असल्याचे दुकानदार सांगतात. छाटण्या सुरु अन् उपलब्धता कमी यामुळे शेतकरी चिंतेत आहे. बेदाण्यासाठी आवश्यक ऑईलची टंचाई आहे. त्याचेही दर वाढवून सांगितले जात आहेत.
साठेबाजांवर कठोर कारवाई
जिल्ह्यातील घाऊक विक्रेत्यांकडे अन्नधान्याची तसेच जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही टंचाई नाही. याची सर्व इत्यंभूत माहिती आमच्याकडे आहे. संकटकाळाचा कोणी फायदा घेत असेल तर अशा साठेबाजांवर कठोर कारवाई केली जाईल. ग्राहकांनी स्वतःच्या नावासह खरेदीच्या तपशिलासह संबंधित व्यापाऱ्याविरोधात पुरवठा विभागाकडे तक्रारी द्याव्यात. शहानिशा करून कठोर कारवाई केली जाईल.
-डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी सांगली
तक्रारीचा पाठपुरावा करु
ग्राहकांनी शिक्का असलेली बिले घ्यावीत. खते व पशुखाद्यांच्या विक्रीची बिले देणे व्यापाऱ्यांवर बंधनकारकच आहे. त्या बिलावर ग्राहकाचीही सही असते. आपल्या तक्रारी टोल फ्री क्रमांकांवर करून त्या तक्रारीचा क्रमांक नमूद करुन घ्यावा. पुढे त्या तक्रारीचा पाठपुरावा ग्राहक पंचायतीच्यावतीने आम्ही करु.
- भास्कर मोहिते, जिल्हा पालक, ग्राहक पंचायत
द्राक्ष बेदाण्यासाठीचे ऑईल दोन दिवसांत उपलब्ध
खताची मागणी अन् वितरण व्यवस्था केली आहे. द्राक्ष बेदाण्यासाठीचे ऑईल दोन दिवसांत उपलब्ध होईल. शिल्लक डॉरमॅक्स विक्रेत्यांकडे पाठवले आहे. दोन दिवसांत आणखी उपलब्ध होईल. कच्चा माल आणून पक्का माल तयार करण्याची प्रक्रिया कामगारांअभावी थांबली आहे. तीही सुरु होईल.
- बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सांगली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.