बेळगाव - मंत्रिमंडळ विस्तार जवळ येईल, तशी इच्छुकांची संख्या वाढतच आहे. राज्य मंत्रिमंडळात आणखी १३ मंत्र्यांची भर घालण्यास भाजप हायकमांडने अनुमती दिली. परंतु, दोन डझनपेक्षा अधिक इच्छुकांनी आता लॉबिंग सुरू केले आहे. त्यामुळे असंतुष्ट आमदारांचे सांत्वन करण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांपुढे आहे. कुणाचे कसे सांत्वन करायचे याची डोकेदुखी त्यांना कायम आहे.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना मंत्रिमंडळ विस्तार करण्यास भाजप हायकमांडने शुक्रवारी अनुमती दिली. मात्र सर्वांचे सांत्वन करून व सर्वांना विश्वासात घेऊन मंत्रिमंडळ विस्तार करण्याची त्यांनी स्पष्ट सूचना केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर असंतोषाचा स्फोट होऊन त्याचा सरकारवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागत आहे. कुणाचे कसे सांत्वन करायचे हाच त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. ११ पैकी १० नुतन आमदारांना व मूळ भाजपच्या तिघांना अशा एकूण १३ जणांची मंत्रीपदी नियुक्ती करण्यात यावी व तीन जागा रिक्त ठेवण्यात याव्यात असे, भाजप श्रेष्ठीनी सुचविले असल्याचे समजते. ११ पैकी एकट्या कोणाला वगळायचे याचे कोडे सुटलेले नाही. शिवाय मूळ भाजप आमदारांना द्यावयाच्या तीन जागांसाठी इच्छुकांची संख्या वाढतीच आहे.
मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव एम. पी. रेणुकाचार्य, सुनील कुमार, श्रीनिवास शेट्टी, के. जी. बोपय्या, अपच्यु रंजन, एस. रामदास, गोळहट्टी शेखर, करुणाकर रेड्डी, रवींद्रनाथ, रघुपती भट, शिवराज पाटील, बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्यासह अनेक जण मंत्री पदावर डोळा ठेवून आहेत. या सर्वांनी मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.
काँग्रेस-धजद युती सरकारच्या काळात मंत्रिपदावरूनच असंतोष निर्माण झाल्याने सरकारचे पतन झाले. अशी परिस्थिती भाजप सरकारच्या काळात होणार नाही याची खबरदारी ते घेत आहेत. यासाठी असंतुष्ट आमदारांना विश्वासात घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराचा येडियुरप्पांचा प्रयत्न आहे. घाई केल्यास त्याचे दूरगामी परिणाम होतील याची त्यांना भीती आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आज सकाळी आपल्या निकटवर्तीयांशी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केली. सहा महिन्यानंतर मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार आहे. त्यावेळी मंत्रीपदापासून वंचित राहिलेल्याना संधी देऊ, असे आश्वासन देऊन मंत्रिमंडळ विस्तार करण्याची त्यांची
योजना आहे.
आमदार निवासस्थानी ठाण मांडून
नूतन ११ आमदारांपैकी एकट्याला मंत्रिमंडळ विस्तापासून वगळण्यात येणार आहे. त्याचे समाधान कसे करायचे हेही एक मोठे आव्हान आहे. सोमवारी किंवा मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांच्या येडियुराप्पांच्या निवासस्थानी फेऱ्या वाढल्या आहेत. डॉलर्स कॉलनीतील येडियुरप्पांच्या धवलगिरी निवासात आज सकाळपासूनच मोठ्या राजकीय हालचाली सुरू होत्या. उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, माजी मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ, उमेश कत्ती यांच्यासह अनेक आमदार निवासस्थानी ठाण मांडून होते.
बेळगाव जिल्ह्यातून पेच
बेळगाव जिल्ह्यातील महेश कुमठळ्ळी व श्रीमंत पाटील यांना वगळण्याचा विचार पूर्वीपासून येडियुराप्पांच्या मनात होता. परंतु हे दोघेही रमेश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्या सूचनेवरूनच या दोघांनीही काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. श्रीमंत पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात यावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्याचे समजते. तर रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळींच्याही पाठीशी असल्याने त्यांनाही वगळणे सोपे नाही. मूळ भाजप आमदारांतून उमेश कत्ती यांना मंत्रिमंडळात घेतल्यास माजी मंत्री अरविंद लिंबावळी, आमदार हालप्पा आचार, हलाडी श्रीनिवास शेट्टी, अंगार, राजू नायक यांच्यासह अन्य काही आमदारांचे सांत्वन कसे करायचे हाही मोठा प्रश्न आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.